सरकार बौध्द तरुणांची दिशाभुल करीत असून त्यांना गुन्हेगार म्हणून साबीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या खोट्या आश्वासनामुळे बौध्द समाजातील तरुणांचे प्रश्न प्रलंबीत आहेत. भिमा कोरेगाव प्रकरणातील तसेच न्याय हक्कासाठी केलेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारने दिले होते. परंतु, आजपर्यत हे गुन्हे मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे हजारो तरुणांना नोकर्यापासून वंचित रहावे लागेल आहे. परंतु, आता बौध्द समाजाला जागृत करुन त्यांना न्याय हक्कासाठी पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे. त्यामुळे भिमा कोरेगाव प्रकरणातील व इतर आंदोलनाचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा पुन्हा तिव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल आणि बौध्द समाज रस्त्यावर उतरला तर सरकारला महागात पडेल, असा इशारा बौध्द आंदोलक विकास लहाने यांनी दिला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी न्याय हक्कासाठी लढा उभा केल्याने सरकारच्या नाकी दम आला आहे. त्याच बरोबर ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला असून आंदोलन करीत आहे. आता बौध्द समाज देखील आंदोलनाच्या पवित्र्यात असून सरकारची कोंडी करणार आहेत. विकास लहाने यांनी दि. 19 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलंय. त्यामुळे त्यांची तब्येत खराब होत आहे. परंतु, सरकार आणि जिल्हा प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याने समाज आक्रमक भुमीका घेण्याची शक्यता आहे. विकास लहाने यांना समाजाचा आणि समाजातील विविध संघटना, पक्ष यांचा पाठींबा देखील वाढत आहे. जर वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर रस्त्यावर उतरावं लागेल असेही विकस लहाने यांनी म्हटलंय.
या संदर्भात विकास लहाने यांनी सरकारला निवेदन सादर केलंय. डउ/डढ वर्गीकरण व क्रिमीलरची अट रद्द करावी, शेतकर्यांना सन 2023-24 पर्यंत सरसगट कर्जमाफी देण्यात यावी. गायरान धारक शेतकरी यांच्या ताब्यात असलेल्या जमीनीच्या नोंदी 7/12 उतार्यावर घेण्यात याव्यात. रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेमधील ग्रामीण भागातील रहिवाशांना अनुदान 5 लाख पर्यंत करण्यात यावे. शहरी झोपडपट्टी मधील रहिवाशांना रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेमधील पी. आर. कार्डची अट रद्द करण्यात यावी व त्याचे अनुदान 5 लाख पर्यंत करण्यात यावे. महात्मा फुले विकास महामंडळ अंतर्गत उद्योजकांना 50 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे. जालना येथील मोतीबाग तलावातील प्रलंबीत भगवान बुद्धाची मुर्ती बसवण्यात यावी. नागपूर येथील दिक्षाभूमी आंदोलक भिमसैनिक यांच्या वरिल गुन्हे मागे घेण्यात यावे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विमानतळाचे तथागत भगवान बुध्द असे नामकरण करण्यात यावे दादर रेल्वे स्टेशनचे नामकरण चैत्यभूमी करण्यात यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना विहिरीसाठी 5 लाख पर्यंत अनुदान वाढवावे. 1 ली ते प्रत्येक क्षेत्रातील उच्च शिक्षण मोफत करावे. भिमा कोरेगाव प्रकरणातील दंगलीमधील भिमसैनिकावरील गुन्हे मागे घेण्यात यावे. समाज कल्याण विभागाचा निधी ईतरत्र न वापरता केवळ एस.सी. व एस.टी. प्रवर्गाच्या कल्याणकारी योजने करिता वापरावा. आदी मागण्या त्यांनी केल्या.
यावेळी उपोषणकर्ते विकास लहाने यांच्यासह प्रमोद खरात, बंडु सुरडकर, दादाराव लहाने, अॅड. योगेश गाडगे, अण्णासाहेब चितेकर, सिध्दार्थ पवार, आनंद म्हस्के, फकीरा काकडे, प्रदिप ढील्पे, अॅड. सुधाकर जाधव, विष्णु रौंदळे, राहुल खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.