आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त वृक्षारोपन
हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.30
निसर्गातील विविध नैसर्गिक साधनांचा वापर करुन औषधी व खते तयार करुन पारंपारीक बियाणे वापरुन केलेली विषमुक्त शेतीलाच सेंद्रिय शेती म्हणतात. अशाप्रकारची शेती करतांना रासायनिक खतांचा वापर न करता शेणखत,कंपोस्ट खत,हिरवळीचे खत,गांडुळ खत,माश्यांचे खत खाटिकखान्याचे खत,हाडांचे खत,तेल बियांच्या खतांचा वापर करुन शेती केल्यास हवा,माती,धान्याची रोपे,पक्षी,मनुष्य प्राणी यांची रोगप्रतिकार शक्ती वाढून आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.भविष्यात शेती टिकवून ठेवायची असल्यास सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत वाढविण्यास मदत होईल.शिवाय वरचेवर खतांच्या वाढत्या किंमतीवर मात करुन कमी खर्चात शेती करता येईल. सोबतच कमी खर्चात तयार होणार्या व विषमुक्त पिक उत्पादनासाठी जीवामृत,दशपर्णी काढा,घन जीवामृत हे द्रावणही शेतीसाठी खुप लाभदायक आहेत.
निरोगी आयुष्य आणि मोफत आॅक्सिजन हवे असल्यास मानवांच्या गरजेनुसार झालेली किंवा होत असलेली वृक्षतोडीची झिज भरुन काढण्यासाठी प्रत्येकाने आपली नैसर्गिक जबाबदारी समजून या पावसाळ्यात एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केल्यास निसर्ग सौदंर्य वाढीस मदत होईल.
आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त सुषमाताई देव नंदाई विषमुक्त सेंद्रिय गट शेतीच्या प्रमुख यांच्या कोथळा रस्त्यावर रस्त्यालगत असलेल्या शेतीच्या बांधावर वड,पिंपळ,करंज व औदुबंर या वृक्षांची लागवड केली.ही वृक्ष काही वर्षानंतर उन्हाळ्यामध्ये रस्त्याने येजा करणार्या वाटसरुंना सावली तर देणारच आहे.शिवाय मोफत आॅक्सिजन सोबतच पक्ष्यांची संख्या वाढून शेतातील पिकांवरील किडे व आळ्या यांच्यावर नियत्रंण ठेवल्या जाणार हे निश्चित आहे.
यावेळी हरिश्चंद्र चिल्लोरे जीवनांकुर संस्थापक,सुषमाताई देव नंदाई समुह प्रमुख, पत्रकार प्रभाकर डुरके,शिंदेसह शेतकर्यांनी वृक्षारोपणात सहभाग नोंदविला.