महाराष्ट्र राज्यात सर्पमित्र आणि वन्यजिव रक्षकांना शासनामार्फत अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे व त्यांचा किमान 50 लाख रुपयाचा विमा शासनाने काढावा या व इतर मागण्या जालना येथील निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या वतीने आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडे करण्यात आल्यात.
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात कुठेही साप निघाल्यास सर्पमित्रांना बोलविले जाते. मनुष्यबळाच्या अभावी वन विभागाचे अधिकारी सापाचे रेस्क्यु करीत नाहीत. त्यामुळे सर्पमित्र धावून जातो. स्वतःचा जिव धोक्यात घालून सर्पमित्र सापाचे रेस्क्यु करीत असतो. परंतु, अचानक अनावधानाने एखादा दंश झाला तर सर्पमित्राचा अकाली मृत्यु होतो. त्यामुळे सर्पमित्राचा परिवार उघड्यावर येतो. अशा परिस्थीतीत सर्पमित्रांच्या परिवारापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शासनाने सर्पमित्रांचा विमा उतरविणे आवश्यक आहे. तसचे रात्री-अपरात्री साप निघाल्यास सर्पमित्रांना घराबाहेर जावे लागते. अशा वेळी पोलीसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. सिग्नल अथवा ट्रॅफीक मधून सर्पमित्रांना तातडीने सापाचे रेस्क्यु करण्यासाठी जावे लागते. अशा वेळी पोलीस कारवाई होते. त्यामुळे सर्पमित्रांना शासकीय ओळखपत्र देऊन त्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात यावा व रुग्णवाहीकेसारखी त्यांना सुट देण्यात यावी. तसेच त्यांचा आपत्कालीन सेवेत समावेश करण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलीय. सापाचे रेस्क्यु करणार्या सर्पमित्रांचा किमान 50 लाख रुपयाचा विमा सरकारकडून काढण्यात यावा. सापाचे रेस्क्यु केल्यानंतर वन विभागाकडून प्रति रेस्क्यु (प्रति कॉल) प्रमाणे मानधन देण्यात यावं. सर्पमित्र हे निसर्गाच्या सानिध्यातील रस्ता भटकणार्या किंवा जखमी झालेल्या सर्वच प्राण्यांचे रेस्क्यु करतात. जखमी प्राण्यावर उपचार करण्यासाठी जालना शहरातील कन्हैयानगर भागात वन विभागाच्या जागेत प्राण्यांचे आनाथालय सुरु करण्यास परवानगी आणि जागा देण्यात यावी. सर्पमित्रांचा आपत्ती व्यवस्थापन आणि एन.डी.आर.एफ. मध्ये समावेश करण्यात यावा. औद्योगिक वसाहतीमध्ये प्राण्यांचे आणि सापाचे रेस्क्यु करण्यासाठी सर्पमित्राची नियुक्ती करण्यात यावी. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष विशाल गायकवाड, उपाध्यक्ष मयुर साबळे, सचिव गोकुळ लाड, अच्युत मोरे, शिवाजी डाकूरकर, राहुल शिंदे, अजय नवगीरे, नसिर शेख, अजिंक्य शिंदे, गोपिनाथ ढोले, रंगनाथ खरात, अजय शिंदे, सुनिल चव्हाण, दिनेश प्रधान, मनोज गायकवाड पवन पाचफुले, सचिन जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.चौकट…..
सर्पमित्रांच्या मागण्यासाठी अधिवेशनात आवाज उठविणार – आमदार कैलास गोरंट्याल
महाराष्ट्रातील सर्पमित्रांच्या आणि वन्यजिव रक्षकांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन आमदार कैलास गोरंट्याल यांना देण्यात आले असता आमदार कैलास गोरंट्याल यांनी सर्पमित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा मारुन सविस्तर माहिती घेतली. त्यावर सर्पमित्र जिव धोक्यात घालून सेवा देतात, त्यांना सरकारकडून विमा मिळालाच पाहिजे, त्यासाठी वन मंत्री यांना पत्र पाठविणार असून आगामी अधिवेशनात आपण सर्पमित्रांच्या मागण्या बाबत आवाज उठविणार असून त्या मागण्या मान्य करुन घेणार असल्याचे आवश्वासन आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिलंय.