मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.13
इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री यांनी जाहिर केलेल्या 100 दिवस उद्दिष्ट कार्य कार्यक्रमातंर्गत संबंधित महाविद्यालयातच मिळणार जात वैधता प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत व डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी पासून पुढे 100 दिवस या कालावधीत 100 दिवस उद्दिष्ट कार्य कार्यक्रमअंतर्गत जालना जिल्ह्यातील इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग व सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग एस.ई.बी.सी. (मराठा) या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरून सदर अर्जाची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयात दाखल करावी. तसेच संबंधित महाविद्यालयांनी अर्ज फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांच्याकडे सादर करावेत. जिल्ह्यातील काही महाविद्यालयामध्ये समितीमार्फत शिबिरे आयोजित करण्यात आले असून त्याच ठिकाणी संबंधितांचे अर्ज स्विकारून त्यांना तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.