मा. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाची अवैध गौण खनिज वाहतूक विरोधात धडक कारवाई — विशेष पथके स्थापन, बोटींचे साहित्य नष्ट, जाफराबाद तहसीलदारांची मोठी कारवाई

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.8
मा. जिल्हाधिकारी असीमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यात महसूल विभागाने अवैध गौण खनिज (वाळू) वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई हाती घेतली असून, या अनुषंगाने विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.
मौजे हनुमंतखेडा येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या बोटींचे साहित्य नष्ट केले, तसेच जप्त करण्यात आलेला वाळूसाठा घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला.
मागील वर्षभरात महसूल विभागाने एकूण ४९ अवैध वाहने पकडली असून, त्यापैकी २७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईतून प्रशासनाने तब्बल ₹१ कोटी १२ लाखांचा दंड वसूल केला आहे.
तसेच, जाफराबाद तालुक्यातील ४३ ठिकाणी महसूल विभागाच्या पथकाने अचानक भेट देऊन ४८९ ब्रास वाळूसाठा जप्त केला असून, हा साठा देखील घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला आहे.
मागील वर्षभरात मौजे कुंभारझरी, हनुमंतखेडा, आळंद व देऊळझरी परिसरात एकूण १६ अवैध बोटी नष्ट करण्यात आल्या असून, या कारवाईत जवळपास ₹८० लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
दरम्यान, नदीपात्रांमध्ये कारवाई करताना पथकांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. नदीपात्र मुख्य रस्त्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असल्याने वेळेत पोहोचणे कठीण होते. दलदलीचा परिसर, काटेरी झुडपे व पाण्यामुळे बोटी पकडणे अवघड जाते. याशिवाय, प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याने कार्यवाहीत विलंब होतो, अशी माहिती महसूल विभागाने दिली आहे.
महसूल विभागाच्या सततच्या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्या बोट व वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने आगामी काळात आणखी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी साहेब भोकरदन यांच्या मार्गदर्शनाखाली, मौजे निमखेडा बु. परिसरातील पूर्णा नदीपात्रात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या बोटींचे साहित्य जप्त करण्यात आले.
सदर कारवाई उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व स्थानिक पोलीस ठाण्याच्या उपस्थितीत करण्यात आली असून, ही कारवाई पूर्णपणे संयुक्त पथकाच्या समन्वयातून पार पाडण्यात आली.



