“जत्रा शासकीय योजनांची -सर्व सामान्यांच्या विकासाची” अभियान प्रभावीपणे यशस्वी करावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
- अभियानाचा कालावधी 15 जून 2023 पर्यंत - एक लाख लाभार्थ्यांना मिळणार योजनेचा थेट लाभ - विभागप्रमुखांनी काटेकोर नियोजन करावे - लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन

जालना/प्रतिनिधी,दि. 17
शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी “जत्रा शासकीय योजनांची -सर्व सामान्यांच्या विकासाची” हे अभियान दि. 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने आपल्या जालना जिल्हयात हे अभियान प्रभावीपणे राबवून अभियानातंर्गत विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे एक लाख लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व विभागप्रमुखांना केली.
“जत्रा शासकीय योजनांची -सर्व सामान्यांच्या विकासाची” या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज आढावा बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, उपजिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांच्यासह तहसिलदार व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे मार्गदर्शन केले.
नियोजन विभागाच्या शासन निर्णयान्वये “जत्रा शासकीय योजनांची – सर्व सामान्यांच्या विकासाची” असे हे अभियान असून त्याचे समन्वयन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. अभियानाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे.
या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. या उपक्रमाची पूर्वतयारी 15 एप्रिल 2023 ते 15 मे, 2023 या कालावधीत करण्यात येईल. या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असेल. लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर / तालुका स्तरावर दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, 15 जून पर्यंत चालणारे हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी उत्तम नियोजन करावे. सुमारे एक लाख लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट या अभियानातंर्गत ठेवण्यात आले आहे. योजनानिहाय लाभार्थ्यांची माहिती विहीत नमुन्यात भरुन द्यावी. या अभियानाचा आढावा नियमितपणे घेतला जाईल. त्यामुळे विभागप्रमुखांनी जबाबदारीने व दक्षतेने काम करुन “जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची” हे अभियान यशस्वी करावे.