मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतल्या मॅरेथॉन बैठका जिल्ह्यातील एकही सुशिक्षीत तरुण बेरोजगार राहणार नाही – मंत्री मंगलप्रभात लोढा
रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि.26
राज्यात जालना हे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढणारे शहर म्हणून नावारुपास येत आहे. येथील तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी तसेच स्वयंरोजगाराच्या वाटा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक पावले टाकत आहेत. तरी स्थानिक औद्योगिक कंपन्यामध्ये ज्या रोजगार कौशल्याची मागणी असेल त्या व्यवसायातील प्रशिक्षण देवून उमेदवारात कौशल्य वाढवून कुशल मनुष्यबळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थ्ोच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाईल. त्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्याने जालना जिल्ह्यातील एकही सुशिक्षीत तरुण बेरोजगार राहणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, कौशल्य विकास विभाग आयुक्त लहू माळी, कौशल्य विकास विभाग सहायक आयुक्त गणेश चिमणकर, कौशल्य विकास विभाग उपायुक्त विद्या शितोळे, देवेश पाथ्रीकर, सहसंचालक पी.टी.देवतळे, डॉ.जकीर पठाण यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, उद्योजक व शासन एकत्र येवून काम केले तर निश्चित महाराष्ट्राची भरभराट होईल. याकरीता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप महत्वाची आहे. ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबवून कुशल मनुष्यबळाची निर्मिती केली जाणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 40 कंपन्यांनी आज रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. कायदा व सुव्यवस्था आणि मनुष्यबळ या आधारावरच नवीन उद्योग उभारत असतो. उद्योग उभारणीत कुशल मनुष्यबळ अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळाची उभारणी करणे गरजेचे आहे. उद्योजकांच्या तांत्रिक गरजेनूसार आयटीआयच्या माध्यमातून नवनवीन व्यवसाय चालु करण्यात येणार आहेत. नवीन व्यवसायासाठी लागणारी मशिनरी शासनाकडून तातडीने पुरविण्यात येईल. संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी गुणवत्तेसह प्रामाणिकपणे आपले काम पार पाडावे. अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतल्या मॅरेथॉन बैठका
जनसंवाद/जनता दरबार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसंदर्भात बैठक, पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव जिल्हास्तरीय समिती बैठक, जिल्हा कौशल्य विभाग आढावा बैठक, संस्था व्यवस्थापन समितीच्या मॅरेथॉन बैठका घेत संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.
सर्व बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, कौशल्य विकास विभाग सहायक आयुक्त गणेश चिमणकर, कौशल्य विकास विभाग उपायुक्त विद्या शितोळे, सहसंचालक पी.टी.देवतळे, यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.



