सायबर जागरुकता कार्यशाळा संपन्न ई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी – जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सपकाळ

जालना/प्रतिनिधी,दि.11
नागरिक, शासकीय कर्मचारी, मुले तसेच तरुणांमध्ये इंटरनेटच्या सुरक्षित आणि जबाबदारीने वापराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सुरक्षित इंटरनेट दिनाचे आयोजन केले जाते. तरी शासकीय कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या ई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी उन्मेश सपकाळ यांनी केले.
जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, जिल्हा कोषागार अधिकारी पंजाब पुंडगे, तहसीलदार प्रणाली तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेचे सादरीकरण व तांत्रिक मार्गदर्शन जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी उन्मेश सपकाळ यांनी केले. सुरक्षीत ई-मेल वापर, सुरक्षीत पासवर्ड, सुरक्षीत डेस्कटॉप, सायबर गुन्हेगारी, समाज माध्यमांचा वापर आदि विषयक तांत्रिक बाबींवर श्री. सपकाळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा उद्देश नवीन ऑनलाइन समस्या आणि समाज माध्यमांच्या चिंताबद्दल जागरूकता निर्माण करणे असा आहे. यावर्षी सुरक्षित इंटरनेट दिन दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी “टुगेदर फॉर अ बेटर इंटरनेट” या थीम अंतर्गत जालना जिल्ह्यात साजरा केला गेला. सायबर जागरुकता कार्यशाळेस मोठ्या संख्येने अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.