ना जातीचे,ना धर्माचे, शिवाजी राजे रयतेचे !

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20
जालना – येथील तक्षशिला बौद्ध धम्म बहुउद्देशीय सेवाभावी संस्था समर्थ नगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते डॉ.बसवराज कोरे म्हणाले की नवस्वराज्य, नवा विचार, नवा माणूस घडवणाऱ्या मानवतावादी छत्रपती शिवरायांचे विचार महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज यांनी पुढे नेले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हेच विचार संविधानात उतरवले.छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा म्हणजे भारतीय संविधानाचा आदर करणे होय. तसेच नवनिर्वाचित नगरसेविका रीमाताई खरात म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराजांचा अष्टपैलू पराक्रम केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कणाकणात रुजला आहे. रयतेच्या उद्धारासाठी त्यांनी केलेल्या महाकाय कर्तृत्वाचा परिचय सर्वांना माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोण्या एका धर्माचे किंवा जातीचे नाहीत तर ते सर्वांचे आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुद्ध विहारातच नाही तर प्रत्येक मंदिरामध्ये साजरी केली जावी. प्रमुख व्याख्याते डॉ. बसवराज कोरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष नाना भोसले तसेच तक्षशिला बुद्ध विहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भिकाजी साळवे यांनी डॉ. बसवराज कोरे यांचे स्वागत केले. संबोधी इंगोले हिने एकच राजा इथे जन्माला हे अभिवादन पर गीत सादर केले.तसेच नवनिर्वाचित नगरसेविका ॲड.रीमाताई खरात यांचे स्वागत छायाबाई साळवे यांनी केले. महेंद्र साळवे यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून दरवर्षी हा उपक्रम राबविण्यासाठी आवाहन केले. यावेळी संभाजी कांबळे, किशोर साळवे, अशोक गंगावणे, अर्चना कांबळे, धनश्री पगारे, रंजीत गायकवाड, मिनाबाई शरणागत, चंद्रकांत वाघमारे, विशाल वाघमारे , सर्व उपासक उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप इंगोले तर आभार प्रदर्शन डॉ. निहाळ यांनी केले.



