जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन बचत ही काळाची गरज असून वेतनातील 20 टक्के रक्कमेची गुंतवणूक करा

जालना/प्रतिनिधी,दि.4
भविष्यातील आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी बचत करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या एकूण वेतनातील किमान 20 टक्के रक्कम विविध योजनांमध्ये गुंतवून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात सायंकाळी 5 वाजता भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा व इतर विविध बचत योजनोविषयक, म्युचुअल फंड तसेच सायबर सुरक्षेवर सविस्तर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, डाक जीवन विमा विकास अधिकारी संदीप महाजन यांच्यासह एचडीएफसी म्युचुअल फंडचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, बदलत्या काळानुसार आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. केवळ पैसे कमावणे पुरेसे नसून, त्याचे योग्य नियोजन आणि गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास सुरक्षिततेसोबतच चांगला परतावा मिळतो, ज्याचा फायदा कुटुंबाला संकटकाळात किंवा निवृत्तीनंतर होऊ शकतो. तसेच ज्या गोष्टीत आपल्याला धोका पत्करावा लागतो तिथे आपल्याला मोबदलाही जास्त पटीने मिळत असतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डाक जीवन विमा विकास अधिकारी संदीप महाजन यांनी डाक विभागाच्या योजनांची विश्वासार्हता आणि त्यातील पारदर्शकतेवर प्रकाश टाकला. डाक जीवन विमा, सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि मुदत ठेव योजनांची माहिती देण्यात आली. तसेच गुंतवणुकीचे महत्त्व पटवून देण्यात आले. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या अधिकाऱ्यांनी बाजारपेठेवर आधारित गुंतवणुकीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच यावेळी सायबर सुरक्षावरही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला विविध विभागातील शासकीय अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
