लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर..! हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 3 पथके
विक्रेत्यांना सी.सी.टि.व्ही. बॅकअप अनिवार्य; प्रत्येक वाहनांची होणार तपासणी
जालना/प्रतिनिधी,दि.19
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जालना जिल्ह्यात लागु झाली असल्याने निवडणूक काळात अवैध मद्य निर्मिती, विक्री,आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली असून 3 भरारी पथकांद्वारे जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करणार आहे, तसेच अंडा आमलेट, चायनिज दुकाने, गाडया आदींवर राज्य उत्पादन शुल्क, विभागाची करडी नजर असणार आहे.
अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे जालना जिल्हा अधीक्षक डॉ. पराग मो. नवलकर यांनी दिली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. संशयित आणि सराईत आरोपींवर विशेष लक्ष ठेण्यात येणार असुन, रात्री उशिरापर्यंत गस्त घालण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकुण 3 पथके गुन्हा अन्वेषणाकामी सज्ज केले आहेत. त्यापैकी एक पथक अंबड कार्यक्षेत्रात, दुसरे पथक जालना कार्यक्षेत्रात तर संपुर्ण जालना जिल्ह्यात तिसऱ्या भरारी पथकाची सर्वत्र करडी नजर असणार आहे. असे डॉ. पराग नवलकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व किरकोळ आणि घाऊक दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य केले असून दहा दिवसांपर्यंत कॅमेऱ्याचा बॅक अप ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असे नमूद करत अधीक्षक डॉ. पराग नवलकर म्हणाले,
अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीबाबत तक्रार आल्यास तत्काळ कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्कच्या जालना कार्यालयात शीघ्र प्रतिसाद पथकाची (क्यूआरटी) स्थापना करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यकारी व अकार्यकारी निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचारी यांना गुणात्मक गुन्हा अन्वेषण करण्यावर भर देण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. असे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनीसांगितले.
साडेतीन महिन्यात 17 लाखांचा मुद्देमाल जप्त..! राज्य उत्पादन शुल्क विभागा मार्फत दि.01 जानेवारी, 2024 ते दि.16 मार्च, 2024 या कालावधीत केलेल्या विविध कारवायांत 180 गुन्हे दाखल करण्यात आले, यात वारस- 138 गुन्हे, बेवारस – 42 गुन्हे, अटक आरोपी 147, तर 07 वाहनांचा समावेश आहे. एकुण रु.17 लाख 68 हजार 925 इतका मुद्देमाल जप्त केला असून निवडणूक काळात मोहीम अधिक तीव्र राबविण्यात येणार असल्याचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी स्पष्ट केले. |