कापसाचे दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत
जिंतूर/ प्रतिनीधी,दि 8
शेतकऱ्यांचे हक्काच्या कपाशीने वैताग आणला आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाची भाववाढ होत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. खर्च अधिक आणि भाव कमी अशा दुहेरी संकटात शेतकरी असून याला सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
येथील परिसरातील कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गेल्या काही वर्षात कापसाला चांगला भाव मिळाल्याने कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. मात्र यावर्षी कापसाला मुहूर्तावर कमी भाव निघालेल्या सहा हजार पाचशे ते सात हजार भावाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका, नागपूरला सुरु असलेले हिवाळी अधिवेशन तसेच दोन वर्षा अगोदर मिळालेल्या १२ ते १३ हजारांच्या भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा यावर्षी होती. तालुक्यात जादा हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाची लागवड केली असून यावर्षी कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाला प्रतिक्विंटल दहा ते बारा हजारांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता होती. उत्पादन कमी झाले असतानाहीभाववाढ झाली नाही. यातही कापूस पिकासाठी लागणारा खर्च व सध्या मिळणारा आठ हजारांचा भाव या दोन्ही बाबी पाहता शेतकऱ्यांना हा भाव परवडणारा नाही.कापसाला कमीत कमी दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक भाव मिळावा, अशी मागणी आहे. मात्र, सध्या बाजारात कापसाला ६५०० ते ७००० पर्यंत भाव दिला जात आहे. पुढील काही दिवसात कापसाला पुन्हा हजारांपुढे भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी दहा कापूस घरातच साठवून ठेवला आहे. खर्च अधिक भाव कमी; शेतकऱ्यांची विदारक स्थिती निर्माण झाली आहे. पांढऱ्या सोन्याची गाडी वाढेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरातच ठेवलेला आहे. भाव वाढीची प्रतीक्षा दिवसेंदिवस बळीराजा बाट पाहत आहे. मात्र सध्याच्या स्थितीमध्ये तरी काहीच दर वाढ झाल्याचे दिसून येत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात वैतागला असल्याचे चित्र चारठाणा येथील सर्व परीसरात पहावयास मिळत आहे. अधिवेशनात विविध मागण्या करिता अनेक पुढारी संघटना आंदोलने मोर्चे काढत आहे,परंतु कापसाच्या भाव वाढी बद्दल कोणतेही पुढारी समोर येताना दिसत नाही.
खर्चासाठी थोडाफार विकला जातो कापूस
उत्पादन खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. यातही कापसाला भाव नसल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी गरजेपुरता कापूस विकून तात्पुरता खर्च भागवत आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात कापसाची साठवणूक केली आहे. सध्या दहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळेल, अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आहे.
प्रगतशील शेतकरी :-कैलास राऊत चारठाणा