“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जालना येथे मॅरेथॉन व वॉकाथॉन उत्साहात
अहिल्याबाईंचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे” - रावसाहेब पाटील दानवे “नागरिकांचा प्रतिसाद पाहता असे उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील - जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना/प्रतिनिधी,दि.2
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष, जालना महानगरतर्फे आज सकाळी भव्य मॅरेथॉन व वॉकाथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पहाटे ६ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये महिलांसह पुरुष, युवक-युवती व लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली असून, अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, जालना ग्रा.जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे उपस्थित होते. त्यांनी या प्रसंगी बोलताना अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “अहिल्यादेवी होळकर या केवळ एक आदर्श स्त्री प्रशासक नव्हत्या, तर त्यांनी आपल्या कार्यातून सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि स्त्री सबलीकरणाचे मूर्त उदाहरण निर्माण केले,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने आणि आयोजनाखाली भव्य मॅरेथॉन व वॉकाथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दानवे यांनी उपस्थितांना थोर समाजसुधारक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याची थोडक्यात माहिती दिली. त्यांनी अहिल्यादेवींनी केलेल्या सामाजिक कार्य, न्यायप्रिय राज्यकारभार व स्त्रीसशक्तीकरणासाठी दिलेल्या योगदानाचे महत्व पटवून दिले. “समाजप्रबोधन आणि जनहित हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भाजपकडून भविष्यातही अशा उपक्रमांचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात येईल, जेणेकरून तरुणाईला प्रेरणा मिळेल आणि सामाजिक भानही निर्माण होईल,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले व अशा सकारात्मक उपक्रमात पुढील काळात अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले.
या मॅरेथॉन व वॉकाथॉन स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला. विशेषत: महिलांची उपस्थिती प्रेरणादायी व उल्लेखनीय ठरली. महिलांचा उत्साह, जिद्द व सहभाग समाजातील बदलत्या मानसिकतेचे प्रतीक ठरला तसेच फिटनेस ग्रुप्स व आरोग्यप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी भाजप महानगर टीम, कार्यकर्ते, स्वयंसेवक, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व स्वयंसेवी संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात आरोग्यविषयक जनजागृती, एकात्मता, राष्ट्रप्रेम आणि महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. जालन्यात भरलेल्या या उत्साही, अनुशासित आणि सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची आणि कार्याची आधुनिक काळातील पुनःप्रस्थापना झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.