अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा सतर्क
बालविवाहाची माहिती देण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा 112 डायल करा
जालना/प्रतिनिधी,दि.9
जिल्ह्यात अक्षय तृतीया 10 मे 2024 रोजीचा मुहूर्त साधून बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा, तालुका व गावपातळीवरील शासकीय यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. त्याबाबत सर्व संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेश दिले आहेत. तरी जिल्ह्यात बालविवाह होत असल्याची किंवा तशी तयारी केली जात असल्याची माहिती मिळाल्यास सजग नागरिकांनी यासंबंधीची माहिती संबंधित यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नवनाथ वामन यांनी केले प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
बालविवाहाची माहिती देणाऱ्या संबंधितांचे नावाची गोपनीयता राखली जाईल. जिल्ह्यात बालविवाह निर्मुलनाकरीता जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 च्या कायद्याची जाणीव व्हावी, यासाठी तसेच बालवयात कोणताही बालक हक्कांपासून वंचित राहू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने कार्यवाही करण्याचे कामकाज सुरु आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये मुलीचे वय 18 वर्षे, तर मुलाचे वय 21 वर्षाच्या आत असताना विवाह केल्यास तो विवाह बालविवाह म्हणून गणला जातो. त्यासाठी 1 लाख रुपये दंड व 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा किंवा दोन्ही या प्रकारच्या शिक्षेची तरतुद आहे.
बालविवाह प्रतिबंधक अधिकारी
गावपातळीवर ग्रामसेवक, तर नागरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या परिसरात वा गावात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास आपण या संबंधितांकडे माहिती देऊ शकता.
चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा 112 डायल करा
जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असतील किंवा होऊ घातले असतील, तर नागरिकांनी चाईल्ड हेल्प लाईन 1098 किंवा 112 या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. तसेच बालविवाहाबाबतची माहिती जवळच्या पोलिस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयातही देता येईल. असेही कळविण्यात आले आहे.