10 वी 12 वी च्या परीक्षा सुरु असल्याने कोणत्याही जिल्ह्या मध्ये रास्ता रोको आंदोलना साठी परवानगी देऊ नये – जितेंद्र गाडेकर,

जालना/प्रतिनिधी, दि.25
राज्यामध्ये मराठा आरक्षणा संबंधी गेले कित्येक दिवसापासून आंदोलने व रास्ता रोको करण्यात आलेले आहेत. त्याबाबत कोणत्याही समाजाने विरोध केलेला नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्ती, समाज यांना संविधानाने अधिकार दिलेला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती समाज आपल्या हक्कासाठी आंदोलने करत असतात. परंतु सध्याची परिस्थिती बघता सध्या दहावी व बारावीच्या परीक्षेचा कालावधी आहे. ज्यांच्या भविष्यासाठी आपण आंदोलने करत आहोत, ते आपलेच विद्यार्थी आहेत. रास्ता रोको आंदोलनामुळे त्यांच्या मनामध्ये भीती चे वातावरण पसरत आहे. त्यामुळे त्यांच्या परीक्षा वर परिणाम होऊन त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परीक्षा कालावधीमध्ये सर्व विद्यार्थी निर्भीडपणे परीक्षेला जावे व परीक्षा देऊन यशस्वी व्हावे, यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 10 वी व 12 वी च्या परीक्षा कालावधीमध्ये कोणत्याही रास्ता रोको आंदोलनास परवानगी देऊ नये ,अशी मागणी समाजिक कार्यकर्ते जितेंद्र गाडेकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली.