संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत विभागस्तरीय तपासणी समितीकडून जालना जिल्ह्यातील कंडारी व मानेगाव गावाची पाहणी

जालना/प्रतिनिधी,दि.4
ग्रामीण भागात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अधिक परिणामकारकपणे राबवून ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यत पोहचविणे आवश्यक असल्याबाबत राज्य शासनाने सुधारीत मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक कंडारी बु. व द्वितीय क्रमांक जालना तालुक्यातील मानेगाव (ज) यांनी पटकाविला आहे. या दोन्ही गावांनी विभागस्तरीय स्पर्धेत भाग घेतला असल्याने या दोन ग्रामपंचायतीची तपासणी करण्यासाठी विभागस्तरीय समितीकडून या गावांची आज पाहणी करण्यात येवून निरीक्षणे नोंदविण्यात आली.
विभागस्तरीय तपासणी समिती पथकात विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त (विकास) तथा विभागस्तरीय तपासणी समितीचे सदस्य सचिव डॉ. राम लाहोटी, विभागीय आयुक्त कार्यालयातील कृषी अधिकारी एल. ए. शिंदे, दिलीप घुंबरे, गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी भगवान तायड, हिमांशू कुलकर्णी, विस्तार अधिकारी विलास घोळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. पथकाकडून गावाची पाहणी करण्यात आली. यामध्ये ग्रामस्तरावर राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय व त्याअंतर्गत पाणीपट्टी वसूली, घरपट्टी वसूली, सार्वजनिक सभागृह, पाणी आराखडा, ग्रामपंचायतीचे लेखा, हर घर नर्सरी उपक्रम, प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधांची व गावातील रस्त्यांची पाहणी, गाव व गाव परिसरातील करण्यात आलेली लोकसहभागातील विकासकामे, वृक्षारोपण, सार्वजनिक स्वच्छता गृह, घनकचरा व्यवस्थापन आदी विषयक तपासणी करण्यात आली. यावेळी मानेगावचे ग्रामविकास अधिकारी मधूकर ठाकरे व सरपंच श्रीमती सुहासिनी संतोष ढेंगळे आणि बदनापूर तालुक्यातील कंडारी गावचे ग्रामविकास अधिकारी श्री. आहेरकर व सरपंच श्रीमती मिरा राजेंद्र फटाले यांच्यासह संबंधित केंद्र प्रमुख, अंगणवाडी सुपरवायझर, व गावच्या ग्रामस्थांची उपस्थिती होती.