pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण हादरलं! बोरखारच्या दिपाली ठाकूरचा १०–१२ कोटींचा घोटाळा – अटक झाली पण काही दिवसांतच जामीन, शासन-प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

0 3 8 3 5 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2

उरण तालुक्यातील जनतेला हादरवून सोडणारा अनेक कोटी रुपयांचा (१०–१२ कोटी) घोटाळा बोरखार गावात उघड झाला आहे. दिपाली अमित ठाकूर (बोरखार – उरण) हिने मर्चंटिंग कंपनीच्या नावाखाली आणि कांता जयप्रकाश ठाकूर (जसखार – उरण) हिची मुलगी असल्याचा विश्वास संपादन करून अनेक गुंतवणूकदारांना लाखो-कोटी रुपयांचा चुना लावल्याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस स्टेशन, जेएनपीटी उरण येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी तिला अटक केली.मात्र आश्चर्यकारकरित्या काही दिवसांतच तिला जामीन मंजूर झाला.

यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे की — “शासन आणि प्रशासन खरंच आरोपीच्या बाजूने आहे का, की आरोपीच्या विरोधात?” असा सूर सर्वसामान्यांच्या चर्चेत ऐकू येत आहे.

सविस्तर माहितीप्रमाणे, जसखार – उरण येथील मेघनाथ जनार्दन ठाकूर यांची चुलत काका (जयप्रकाश ठाकूर) व काकी (कांता जयप्रकाश ठाकूर) नातेवाईक असल्यामुळे त्यांचा विश्वास संपादन करून, “मार्चंडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा मिळेल” अशा गोड आश्वासनांनी लाखो-कोटी रुपयांची उकळी करण्यात आली.

आरोपी दिपाली ठाकूर हिने मेघनाथ ठाकूर यांना तीन वेगवेगळ्या करारांत पैसे गुंतवायला लावले — (१) १५ लाख दिल्यास ३ वर्षांसाठी दर दोन महिन्याला ५–६ लाख, (२) १० लाख दिल्यास दर महिन्याला ८.५० लाख एका वर्षासाठी, आणि (३) आणखी १० लाख दिल्यास ५ वर्षांसाठी दर दोन महिन्याला २ लाख रुपये देण्याचे आश्वासन.

यासाठी कौस्तुभ सुरेंद्र डाकी (बोरखार) याचे बाँड घेऊन, ‘जर मी पैसे बुडवले तर राहते घर किंवा आवारातील जागा तुला देईन’ असे लिहून दिले. तसेच निर्मला सुधीर पाटील (न्हावा) व शहाबुद्दीन शेख (मुंबई) हे माझे बिझनेस पार्टनर असल्याचे सांगितले.

मेघनाथ ठाकूर यांचा आरोप आहे की, आरोपीने त्यांच्या आईच्या घराची (कांता जयप्रकाश ठाकूर) व सासरच्या (अमित सुरेश ठाकूर) घर-जमिनीची विक्री करून पैसे देण्याचे तोंडी सांगितले होते. पण प्रत्यक्षात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतल्यावरही त्यांना एकही रुपया परत दिला नाही.

पैशांच्या मोबदल्यात बॉण्ड पेपरवर इतर दोन लोकांच्या नावाने – (सीताराम थली – विंधणे), (कांता जयप्रकाश ठाकूर) – करार, तसेच काही रकमेचे चेक देण्यात आले. मात्र हे सर्व चेक बाऊन्स झाले आणि संबंधित बँक खाती बंद करण्यात आली.

मेघनाथ ठाकूर यांनी सांगितले की, पोलिसांपुढे जबानी देतानाही दिपाली ठाकूर सतत खोटे बोलत राहिली – कधी ‘पुण्याला आलेय पैसे आणायला’, कधी ‘ठाण्याला आलेय पैसे घ्यायला’ अशी कारणे दिली. ८ ऑगस्टला लेखी तक्रार देताना सिनिअर अधिकाऱ्यांसमोर ‘३६ लाख देईन’ असे बोलूनही ती पुन्हा वचनभंग करत राहिली.

दिपाली ठाकूर हिने इतर गुंतवणूकदारांना “जर पोलिसांत गेलात तर पैसे मिळणार नाहीत” अशा धमक्या दिल्या. यामुळे बऱ्याच लोकांनी तक्रार करण्यास टाळाटाळ केली. मात्र सात-आठ महिन्यांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर अखेर न्हावा शेवा पोलिसांनी मोठी कारवाई करत दिपाली ठाकूरला बेड्या ठोकल्या.

नागरिकांचे म्हणणे आहे की, “सामान्य माणसाला एखाद्या छोट्या गुन्ह्यातसुद्धा आठवडे-आठवडे पोलीस कोठडीत ठेवले जाते, पण इथे कोट्यवधींच्या घोटाळ्यानंतरही आरोपीला काही दिवसांतच मोकळं सोडण्यात आलं” — हा दुहेरी न्याय सहन केला जाणार नाही.

स्थानिक पातळीवर आता गुंतवणूकदार एकत्र येऊन मोर्चा, निवेदन आणि न्यायालयीन लढाई सुरू करण्याच्या तयारीत आहेत. पोलीसांनी जरी सांगितले की (सीताराम थली – विंधणे), (कांता जयप्रकाश ठाकूर) यांच्यासह इतर आरोपींचा शोध सुरू आहे, तरी त्वरित जामीनामुळे चौकशीवर परिणाम होईल का ? हा सर्वांचा मोठा प्रश्न आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे