जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून जनजागृती शिबीर संपन्न
जालना/प्रतिनिधी, दि.13
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिनदर्शिकेत नमुद केल्यानुसार व अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी निर्देशित केल्यानुसार दि. 11 डिसेंबर 2023 रोजी मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हा कारागृह जालना येथे जनजागृती शिबीर संपन्न झाले. मार्गदर्शक म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे- वाघ तसेच लोकअभिरक्षक कार्यालयाचे विधिज्ञ अॅड. मौजुद शेख आणि अॅड. अर्सलान पठाण उपस्थित होते.
श्रीमती भारसाकडे-वाघ म्हणाल्या की, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोकअभिरक्षक कार्यालय हे स्थापन केले आहे आणि या कार्यालयाअंतर्गत फौजदारी प्रकरणांमध्ये मोफत विधिज्ञ दिले जातात. भारतीय संविधानात ‘सामाजिक न्याय’ ही संकल्पना आहे. सामाजिक न्यायाची संकल्पना म्हणजे समाजातील दुर्बल व वंचित घटक म्हणजेच मागासवर्गीय, गरीब, स्त्रिया तसेच मुल हे न्यायापासुन वंचित राहु नये म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत विधी सहाय्य दिले जाते. अॅड. पठाण म्हणाले की, आज ‘मानवी हक्क दिन’. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जाहीरनाम्यानुसार 1948 पासून 10 डिसेंबर हा ‘मानवी हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘मानवी हक्क’ हे मूलभूत आणि नैसर्गिक हक्क आहेत, जे माणसाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहेत. हे हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी 10 डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ म्हणून साजरा केला जातो. असे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.