पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.23
जालना पाटबंधारे विभागांतर्गत विविध प्रकल्पांतून अनेक ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र या योजनांकडून पाणीपट्टी भरण्याबाबत सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. सध्या विभागाची 4 कोटी 85 लाख 63 हजार रुपयांची थकबाकी आहे. तरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत योजनाधारकांनी सात दिवसांची अंतिम मुदतीत आपली थकबाकी जमा करावी, असे कार्यकारी अभियंता एस. बी. कोरके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील भाग 6, कलम 49 (ज) नुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये केवळ पाणीपुरवठाच नव्हे, तर संबंधित योजनेचा विद्युत पुरवठाही खंडित करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.


