0
1
7
4
0
8
जालना/प्रतिनिधी, दि.4
ब्राह्मण समाजाची भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी ब्राह्मण समाजसेवक दीपक रणनवरे यांनी गत सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून रविवार सकाळी अकरा ते पाच वाजे पर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणास समाजबांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. शहरासह संपूर्ण जिल्हा व राज्यभरातून अनेक समाजबांधव यात सहभागी झाले होते.आर्थिक विकास महामंडळासाठी 28 नोव्हेंबरपासून रणनवरे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. गत सहा दिवसांत विविध लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, विविध समाजाच्या संघटना, प्रतिनिधींनी भेट घेऊन ब्राह्मण समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दिला. रविवार, दि. 3 डिसेंबर रोजी ब्राह्मण समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करून महामंडळासह विविध मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
मान्यवरांच्या भेटी
दीपक रणनवरे यांच्या आंदोलनास राजकीय पदाधिकारी व मान्यवर रोज उपस्थिती लावून पाठिंबा देत आहेत. रविवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, शहरप्रमुख बाला परदेशी, शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले, नगरसेवक अशोग पांगारकर यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन रणनवरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून पाठिंबा दर्शविला.
प्रकृती खालावली
रविवारी सहाव्या दिवशी मुख्य उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांची प्रकृती चांगलीच खालवल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आला असून, किडणीवर काही प्रमाणात सूज आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. एकूणच प्रतिकार शक्ती कमी होत असल्याचे यावेळी प्रकर्षाने दिसून आले.
पालकमंत्री अतूल सावे, मुनगुंटीवार, जयंती पाटील, अंबादास दानवे यांनी साधला संवाद
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतूल सावे यांनी रविवारी दुपारी उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधून देण्याचे आश्वासन दिले. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री सुधीर मुनगुंटीवार आदींनी दीपक रणनवरे यांच्याशी संवाद साधून विचारपूस केली.
आंदोलन सर्व समाजाचे
परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी गाव पातळीवर ब्राह्मण समाजाने उद्यापासून उपोषण करावे, आंदोलन करावे, आपल्या तालुक्यातील आमदारांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी विधीमंडळात आवाज उठविण्याबाबत निवेदन द्यावे. माझ्या प्रकृतीची चिंता करू नका, परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा झाल्यानंतरच मी उपोषण मागे घेईल, समाज जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरु राहील, हे उपोषण दीपक रणनवरे यांचे नाही तर समस्त ब्राह्मण समाजाचे आहे. माझ्या उपोषणासंदर्भात काही अफवा पसरवली जात आहे, त्यावर समाजाने विश्वास ठेवू नये.
– दीपक रणनवरे
आज पत्रकार परिषदेचे आयोजन
अन्नत्याग आंदोलनकर्ते दीपक रणनवरे हे सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. सोमवारी दुपारी 1 वाजता गांधी चमन येथील उपोषणस्थळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
–
चतुर्वेद शांतीपाठाचे पठण
मुख्य उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांच्या आरोग्यासाठी चतुर्वेद शांतीपाठाचे आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी हभप नानामहाराज पोखरीकर यांच्यासह शेकडो पुरोहित वर्ग या शांतीपाठासाठी उपस्थित होता.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
1
7
4
0
8