स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावेत
जालना/प्रतिनिधी,दि.24
इयत्ता अकरावी व बारावी तसेच बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाहभत्ता व इतर आवश्यक सुविधावर खर्च करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केलेली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र असलेल्या सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह थेट जालना येथील समाज कल्याण कार्यालयात दि. 31 डिसेंबर 2023 पुर्वी सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रदिप भोगले यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतंर्गत जालना महानगरपालिकेच्या हदीपासून पाच किलोमिटरच्या आत असलेल्या महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी, बारावी तसेच बारावीनंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये, भोजन भत्ता, 12 हजार रुपये निवास भत्ता अशी एकुण 37 हजार रुपये इतकी रक्कम मंजुर केली जाते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रूपये 2 लाख 50 हजार रुपयांच्या आत असणे अपेक्षीत आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यास दहावी, अकरावी व बारावी या अभ्यासक्रमात किमान 50 टक्के गुण असणे अपेक्षीत आहे. तसेच अनु.जाती व नवबौध्द घटकातील दिव्यांगासाठी 40 टक्के गुण असणे अपेक्षीत आहे. सदर विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे अपेक्षीत आहे. अर्जाचा नमुना सहायक आयुक्त, समाजकल्याण, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना या कार्यालयास संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.