भारतीय संविधान दिनानिमित्त उद्देशिकाचे सामुहिक वाचन

जालना/प्रतिनिधी,दि. 26
भारतीय संविधान दिन हा जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी उपस्थितांसह भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी सुकेशिनी पगारे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांना प्रोत्साहन देणे आणि संविधानाबद्दल जनजागृती करणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये आजच्या दिवशी भारताच्या संविधान सभेने संविधान स्वीकारले होते. हा दिवस संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानाला समर्पित आहे. अपर जिल्हाधिकारी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांप्रति आपली निष्ठा आणि वचनबद्धता यावेळी व्यक्त केली. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून, ते देशाच्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. या कार्यक्रमातून संविधानाने दिलेल्या हक्कांसोबतच मूलभूत कर्तव्यांची जाणीव ठेवून देशाची एकात्मता आणि अखंडता कायम राखण्याचा संकल्पही सर्वांनी यावेळी केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

