ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वतावर दरड कोसळली
डाऊरनगर परिसरातील 15 घरातील 30 ते 35 नागरिकांच्या जीवितेला धोका.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20
गेल्या 3 ते 4 दिवसापासून रायगड जिल्हयात मुसळधार पाउस पडत असून वादळवाराही मोठ्या प्रमाणात सुटला आहे. नागरिकांच्या जीवाला धोका असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेशहि प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. मात्र सतत पडणारे पाउस व वादळवारा यामूळे उरणमधील ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या द्रोणागिरी पर्वताचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. सतत पडणारे पावसाचे पाणी यामुळे द्रोणागिरी डोंगर खचले असून बुधवार दि. 19 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता डाऊरनगर येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे.दरड नागरिकांच्या घराजवळ कोसळली. सुदैवाने यात कोणतेही जिवितहानी झाली नाही मात्र डाउरनगर येथे माळीण किंवा इर्षाळवाडी सारखी दरड कोसळून घातपात होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे डाउरनगर येथील नागरिकांच्या जिविताला भविष्यात खूप मोठा घोका निर्माण होणार आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन डाउरनगर परिसरात राहणा-या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेउन तिथे संरक्षक जाळी बसवावी अशी मागणी डाउरनगर ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान चाणजे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अमित भगत, उपसरपंच सोनाली ठाकूर यांनी सदर घटनेची पाहणी केली आहे.
रायगड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे.मुसळधार पाऊस वादळवारा यामूळे रायगड जिल्ह्यातील काही डोंगर पर्वत खचत चालली आहेत.तर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडत आहेत. माळीण दुर्घटना, त्या नंतर आता खालापूर तालुक्यातील इर्शाळगड दुर्घटना झाली. यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला. मात्र तशाच प्रकारची घटना उरण मधील द्रोणागिरी पर्वतावरील डाउनगर भागात होणार असल्याने प्रशासनाने येथे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
—————————————————–
डाऊरनगर येथे दरड कोसळल्याची घटना समजताच आमची आपात्कालीन यंत्रणा लगेच तिथे दाखल झाली आहे.तलाठी, ग्रामसेवक हे घटना स्थळी जाऊन तेथील पाहणी करून आले आहेत. नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना देखील दिलेल्या आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी दगड, माती काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.नागरिकांना सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जात आहेत.
– उद्धव कदम, तहसीलदार, उरण.
_________________________________
दरड कोसळल्याने लगेच कामगारांना बोलावून दरड कोसळलेल्या ठिकाणी जाऊन माती, दगड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.सतत सारखा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कामे करण्यात अडथळा येत आहेत. जेसीबी लावून काम करता येत नाहीत. तसेच ऐन वेळी काम करण्यासाठी वेळेवर माणसे मिळत नाहीत.तरी 8 ते 10 माणसे सदर ठिकाणी कामाला आहेत. चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत कोणतेही अनुचित घटना, दुर्घटना घडू नये यासाठी ग्रामपंचायत तर्फे विशेष काळजी घेण्यात येत आहे.
-अमित भगत, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत चाणजे.
गेली अनेक वर्षापासून आम्हा ग्रामस्थांच्या जिवितेला धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे आमचा कधीही मृत्यु होऊ शकतो.त्यामुळे प्रशासनाने दरड कोसळू नये यासाठी प्रभावी व कायमस्वरूपी अशी उपाययोजना करावी अशी मागणी आम्हा ग्रामस्थांची आहे.
– भारती पाटील, ग्रामस्थ, डाऊरनगर.
सतत पडणाऱ्या पावसामुळे, वादळवारामुळे, आमच्या घरात पावसाचे, नाल्याचे पाणी घुसून घरातील मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र झालेले नुकसान बघण्यासाठी शासनाचे कोणतेही प्रतिनिधी किंवा अधिकारी येथे आले नाहीत. आमच्या जागेची पाहणी करून शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. अशी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत
-ऋषिकेश ठाकूर, ग्रामस्थ, डाऊरनगर.
__________________________________