फळपिक विमा मिळण्यासासाठी अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.10
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना कृषि व पदुम विभाग शासन निर्णयान्वये मृग व आंबिया बहार सन 2021-22 ते 2023-24 या कालावधीकरिता जालना जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला असून त्यांना विमा नुकसान भरपाई मिळण्यास अपात्र करण्यात आले आहे. त्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, जेणेकरून संयुक्त समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी 4 हे. क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. तसेच अधिसूचित फळपिकासाठी एका वर्षात एका क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल.जिल्ह्यामध्ये वरीलप्रमाणे अटी व शर्तीचे पालन न करता बोगस विमा प्रकरणे निदर्शनास आलेली होती. त्यानुसार तपासणी करून बोगस विमा काढण्याऱ्यावर शासन निर्णयानुसार कार्यवाही करणे बाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुषंगाने कृषि आयुक्तांनी संबधित विमा कंपनी यांनी 100 टक्के क्षेत्रीय तपासणी करण्याचे आदेश दिलेले असून आंबिया बहार 22-23 मध्ये एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरंस विमा कंपनी मार्फत जालना जिल्ह्यात 100 टक्के क्षेत्रीय तपासणी करण्यात आलेली आहे. एकूण 47683 अर्जदार शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली व 39756 अर्जदार शेतकऱ्यांना फळपिक योजनेस अटी व शर्तीनुसार पात्र ठरविलेले असून 7927 शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.