जागतिक कर्करोग दिन : कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत रोगनिदान होणे आवश्यक

जालना, दि.३
जागतिक कर्करोग दिन : कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत रोगनिदान होणे आवश्यक
संपुर्ण जगामध्ये दरवर्षी 04 फेब्रुवारी रोजी ‘जागतिक कर्करोग दिन’ साजरा करण्यात येतो. कर्करोगाबाबत लवकर निदान होणे, प्रतिबंध करणे, उपचार व जीवनशैलीचा वापर इत्यादी विषयी जनजागृती करणे हे मुख्य उदिद्ष्ट आहेत. जागतिक कर्करोग दिनाचे प्राथमिक उदिद्ष्ट कर्करोगाचे प्रमाण व मृत्यू कमी करणे असुन, कर्करोगापासुन बचाव कसा करावा या बाबतची माहितीची जनजागृती करण्याचे उदिद्ष्ट आहे.
असंसर्गजन्य आजारांची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे कर्करोगाबाबतची माहिती जनतेस मिळणे आवश्यक आहे. कारण कर्करोग कोणालाही होवू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कर्करोग हा दुसऱ्या क्रंमाकाचा सर्वात घातक आजार आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या कर्करोगामुळे मृत्यू होतो. कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची स्थिती भारतासाठी गंभीर आहे. कर्करोगामध्ये रोगांचा समुह असुन, त्यामध्ये असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढुन शरीराच्या अवयवमध्ये पसरतात. ॲन्कोलॉजी (कर्करोगाचा अभ्यास) आणि कर्करोगावरील संशोधनासाठी प्रशिक्षण व शिक्षणासाठी सुविधा प्रदान करणे आवश्यक आहे. ज्यामुळे कर्करोगामुळे होणारे मृत्यू टाळणे शक्य होईल.
कर्करागाच्या प्राथमिक अवस्थेत सतत अतिसार, अशक्तपणा, खोकला तोंडातुन रक्त येणे, स्तनातील गाठ, कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात कमीत कमी किंवा कोणतेही लक्षणे आढळुन येत नाही. यासाठी मेमोग्राम, ओ.व्ही.ई., व्ही.आय.ऐ., सिटी स्कॅन, एम.आर.आय., सोनोग्राफी, बायोप्सी इ. तपासणीमुळे कर्करोग अंतिम टप्प्यामध्ये जाण्यापुर्वी कर्करोगाचे निदान होते. एच.पी.व्ही. (हयुमन पॅपिलोमाव्हायरस) लसींमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येतो. तसेच हिपॅटायटीस बी या लसीमुळे यकृतचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
आज कर्करोगामध्ये विविध उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांच्या शरीरामध्ये किंवा कोणत्या टप्प्यात आहे यावर उपचार पध्दती अवलंबुन आहे. कर्करोगाच्या उपचारामध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडियशन थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मानथेरपी इ. प्रकाराचा वापर केला जातो.
कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात कमीत-कमी किंवा कोणतेही लक्षणे आढळुन येत नाही. याकरिता नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. कारण कर्करोग अंतिम टप्प्यात जाण्यापुर्वी कर्करोगाचे निदान होते. त्यामुळे पुढील मृत्यूचा धोका टळतो. लवकर निदान लवकर उपचारामुळे कमी खर्चात उपचार होतो. अर्थात उशीरा निदान झाल्यामुळे उपचार खर्चिक होतो. तसेच हॉस्पीटलमध्ये दीर्घकाळ ऑडमिट राहावे लागते. संतुलीत आहार, फळे, हिरवा पालेभाज्या इ. समावेश असावा. नियमित व्यायाम करणे. अतिनील किरणोत्सर्गाचा संपर्क टाळणे, प्रदुषण, तंबाखु व मद्यपानाचे सेवन करु नये. रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्याकारणाने कर्करोगाचा धोका कमी होतो. निरोगी जीवनशैली असावी.
जालना जिल्ह्यात सन 2021 ते 2025 या कालावधीत मौखिक कर्करोगाच्या 75, 955 तपासणी करण्यात आल्यात यामध्ये 184 रोगनिदान झाले असुन, 173 औषधोपचाराखाली आहेत. तसेच स्तनाचा कर्करोगाच्या 39,432 तपासणी करण्यात आल्यात यामध्ये 142 रोगनिदान झाले असुन, 133 औषधोपचाराखाली आहेत. गर्भाशय मुखाचा कर्करोगाच्या 50,383 तपासणी करण्यात आल्यात यामध्ये 158 रोगनिदान झाले असुन, 141 औषधोपचाराखाली असल्याची माहिती जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी दिली. जिल्ह्यातील 30 वर्षावरील स्त्री / पुरुष यांनी नियमित आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी टोल फ्रि क्रमांक 104 / 102 या हेल्पलाईनवर कॉल करावा

