
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.3
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अजित दादा पवार यांच्या टेंभुर्णी आणि जाफराबाद तालुक्यातील आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळाला आहे.24 जानेवारी 2018 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाफराबाद येथे महायुती सरकारच्या विरोधात आयोजित हल्लाबोल मोर्चाच्या प्रसंगी अजित दादा पवार जाफराबाद तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. दादा त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते. अजित दादा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या भोजनाची जबाबदारी पक्षाचे नेते तथा तत्कालीन पालकमंत्री राजेश भैय्या टोपे आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन कृषी सभापती रामधन कळंबे यांच्यावर सोपविली होती. राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्र राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या अजित दादांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी मोठी होती. कृषी भूषण नंदकिशोर काबरा यांच्या शेतातील चिकूच्या बागेत दादांच्या जेवणाची व्यवस्था रामधन कळंबे यांनी केली होती. निसर्गरम्य वातावरणात आयोजित केलेल्या जेवणावळीचे दादांनी तोंड भरून कौतुक तर केले पण हे नियोजन कोणी केले अशी विचारणा त्यांनी चंद्रकांत दानवे यांच्याकडे केली होती. रामधन कळंबे यांनी सदर नियोजन केल्याचे कळल्यावर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देखील देण्यास विसरले नव्हते. अजित दादांनी दिलेली ही कौतुकाची थाप आपल्यासाठी कायम प्रेरणादायक राहिल्याचे रामधन कळंबे यांनी सांगितले. त्यावेळी अजित दादा पवार यांच्या समवेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ,माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

