तरुणाच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा:खा. बळवंत वानखडे, ॲड. यशोमती ठाकूर यांची मागणी

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि 22
अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी जितू अळसपुरे या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. या तरुणाला पोलिस वाहनाचा धक्का लागल्याचा आरोप या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान या अपघात प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी खा. बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. याच विषयी सोमवारी त्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.जितू अळसपुरे यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांना सहा महिन्यांचे बाळ आहे, पत्नी आहे. त्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेला आहे. त्यामुळे ही चुक ज्याची असेल त्यांना पोलिसांनी सोडता कामा नये. तसेच तरुणाच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी मंत्री ठाकूर यांनी केली आहे. अपघात ज्या ठिकाणी झाला, त्या परिसरात रस्ता बनवणाऱ्या कंपनीने वाहनचालकांना योग्य माहिती देणारे सूचना फलक लावले नव्हते. त्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती. तपासात पोलिसांनी या मुद्यावरही लक्ष देणे अपेक्षित असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.