उरण मधील मुस्लिम बांधवांतर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा रॅली द्वारे निषेध.
दहशदवाद्याना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी ; उरण पोलीस ठाण्यात देण्यात आले निवेदन.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28
उरण तालुक्यातील मुस्लिम समाज, मुस्लिम बांधव हे शांतताप्रिय व देशप्रेमी असून पूर्वीपासूनच उरण मधील मुस्लिम समाज समता, बंधुता, एकता,सर्व धर्म समभाव,समानता आदी मानवतेची मूल्ये जोपासत आला आहे.भारताच्या प्रत्येक उपक्रमात, सुख दुःखात मुस्लिम समाज नेहमी सहभागी होत असतात. भारतातील काश्मीर राज्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ हुन अधिक निष्पाप भारतीय व्यक्तींचा मृत्यू झाला. २६ हुन अधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याने भारत देश व इतर अन्य विविध देशाने सुद्धा हळहळ व्यक्त करत शोक व्यक्त केला. सदर दहशतवादी हल्ल्यामुळे भारतातील नागरिकांमध्ये दहशतवादी विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दहशतवादी विरोधात संपूर्ण भारतात व महाराष्ट्र राज्यातही सर्वत्र निषेध, बैठका, लॉंग मार्च, कॅण्डल मार्च काढले गेले. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे राहणारे, एकनिष्ठ देशभक्त असलेले मुस्लिम बांधवांतर्फे दहशदवाद्यांचा निषेध करण्यात आला. रॅली काढून व पोलीस स्टेशनला निवेदन देऊन मुस्लिम समाजाने आपला संताप व्यक्त केला. उरण शहरातील मस्जिद मोहल्ला ते गांधी पुतळा, जरी मरी मंदिर बाझारपेठ, उरण पोलीस स्टेशन या मार्गावर हातात बॅनर घेऊन रॅली काढून निषेध करण्यात आला. शेवटी उरण पोलीस ठाण्यात निवेदन देऊन दहशतवादी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे कर्ते, त्याचे समर्थक आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या व्यक्तीना कायद्याच्या कठोर चौकटीत शिक्षा करावी.हुतात्म्यांच्या बलिदानाचा सूड घेण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित न्यायाच्या कक्षेत आणावे.हुतात्म्याप्रति एकता आणि त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ, शोक व्यक्त करण्यासाठी एक महिन्यासाठी सर्व अनावश्यक सरकारी कार्यक्रम स्थगित करण्याची घोषणा करावी,सरकारी आदेश (जी.आर.) जारी करून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ३० दिवसांसाठी प्रतीकात्मक चिन्ह (जी.आर. मध्ये नमूद केलेले) परिधान करण्याचे आदेश द्यावेत,शोकाकुल भारतीय नागरिक म्हणून सामूहिक शोक आणि संकल्पासह सर्व गुन्हेगार आणि आणि त्यांना मदत करणाऱ्यांना पकडून त्यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी उरण तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.