सर्व सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करावा- माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची मागणी
वडीगोद्री/प्रतिनिधी, दि.28
आंतरराष्ट्रीय स्तरावर, २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिवस साजरा केला जातो. मात्र या वर्षी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी तसेच ईद ए मिलाद या सणाची सुट्टी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे माहिती अधिकार हक्काचे महत्व कायम राहावे म्हणून माहिती अधिकार दिन २८ ऐवजी २७ किंवा २९ सप्टेंबर रोजी साजरा करावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा कार्याध्यक्ष सखाराम पी.घोडके यांनी जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ सर तसेच अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेब, उपजिल्हाधिकारी साहेब सामान्य प्रशासन जालना, उपजिल्हाधिकारी साहेब जालना, मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम जालना, जिल्हा शल्य चिकिस्तक साहेब जालना, शिक्षणाधिकारी प्राथमिक जालना, शिक्षण अधिकारी माध्यमिक जालना, उपविभागीय अधिकारी अंबड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काकडे, जिल्हा सरचिटणीस दत्ता बी. शेंडगे जिल्हा सहसचिव राहुल आर. ढवळे घनसावंगी तालुका अध्यक्ष अँड. प्रदीप डी. लेकुरवाळे, कार्यकारी संघटक अंबड कुलदीप आर. आटोळे, प्रचार प्रमुख अंबड सुनील एस. गायकवाड, सहप्रचार संयोजक घनसावंगी सचिन एस. खोजे, उपप्रचार संघटक अंबड श्रीहरी निर्मळ, अशोक खेडकर, सिद्धार्थ जेठे, अंकुश चव्हाण, राजू काकडे, उपस्थित होते.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रचार व प्रसार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे की २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून शासकीय कार्यालयात साजरा केला जावा.
शासन निर्णयानुसार दर वर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे शासनाचे आदेश आहे. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे शासनाने सुचविले आहे.
माहिती अधिकार कायदा २००५ पासून अमलात आलेला असला तरीही जालना जिल्ह्यातील तालुकास्तरीय कार्यालयात माहिती अधिकाराच्या फलकाचा अभाव असून बऱ्याच सरकारी कार्यालयात ते फलक दर्शनी भागात लावण्यात आलेले नाही, तर खेड्यापाड्यापर्यंत हवी तशी अजूनही जनजागृती झालेली दिसून येत नाही. यातूनच सरकारची उदासीनता दिसून येत आहे.
शासकीय कार्यालयात व अधिनिस्त असलेल्या सर्वच शासकीय कार्यालयात अंमलबजावणी व्हावी. मात्र या वर्षी २८ सप्टेंबर या दिवशी अनंत चतुर्दशी तसेच ईद ए मिलाद या सणाची सुट्टी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर या दिवशी शक्य नसल्यास सदर माहिती अधिकार दिन हा २७ सप्टेंबर या दिवशी किंवा २९ सप्टेंबर या दिवशी साजरा करावा, तसेच तशा सूचना आपल्या अधिनिस्त सर्व शासकीय कार्यालयांना तातडीने कराव्यात अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया
१) माहिती अधिकार दिन साजरा करणे व त्याविषयी सर्वसामान्य जनतेला जागृत करणे हे सर्व सरकारी कार्यालयाला कायद्याने बंधनकारक आहे तसेच अधिकार्यांचे ते आद्य कर्तव्य आहे.
सखाराम पी. घोडके माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा कार्याध्यक्ष
२) माहिती अधिकार कायदा २००५ नुसार प्रतिवर्षी २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून संपूर्ण देशांमध्ये साजरा केला जातो. आज जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेबांना दिलेल्या निवेदनामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये माहिती अधिकार दिन साजरा करून सर्वसामान्यांना माहिती अधिकाराची माहिती जाणीव व्हावी या हेतूने आज निवेदन देण्यात आले. मात्र जे शासकीय कार्यालय माहिती अधिकार दिन साजरा करणार नाही नियमाने त्यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई जिल्हाधिकारी साहेबांनी करायलाच पाहिजे.
ॲड. प्रदीप डी. लेकरवाळे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य घनसावंगी तालुका अध्यक्ष.