‘आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी नोंद करण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.29
राज्यातील 20 जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या Up scaling apda Mitra या योजनेचे यश विचारात घेऊन उर्वरित 16 जिल्ह्यात ‘आपदा मित्र’प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजीचे शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यामधून एकूण 300 आपदा मित्रांना (स्वयंसेवक) आपत्ती व्यवस्थापन विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपदा मित्रांत नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी NCC/NSS विद्यार्थी, NGO, आशा, पोलिस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खाजगी सुरक्षा रक्षक, शासकीय/निम शासकीय कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे.
सहभागी होणा-या प्रशिक्षणार्थीना 12 दिवसाचे निवासी प्रशिक्षण, वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच (ERK), 3 वर्षाकरिता 5 लाखाचे विमा संरक्षण राज्य शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील कीट आपदा मित्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.
आपदा मित्र निवड निकष
सदर व्यक्ती हि भारताची नागरिक असावी व संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असावी. सदर व्यक्ती हि शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावी. वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष (माजी सैनिक, डॉक्टर, स्थापत्य अभियंता, शास्त्रज्ञ, आपत्कालीन सेवेतून सेवानिवृत अधिकारी व कर्मचारी यांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेता येईल त्याकरिता वयोमर्यादा 55 वर्षे असेल मात्र त्यांना विमा सुरक्षा देता येणार नाही.) आपदा मित्र प्रशिक्षणामध्ये किमान 35% महिलांचा सहभाग असणे आवश्यक आहे.
जालना जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपत्ती व्यवस्थापनामध्ये “आपदा मित्र (आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारा स्वयंसेवक) म्हणून स्वेच्छेने प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीने आपत्ती शाखा क्रिस्ताविकारी कार्यालय जालना अथवा आपल्या नजीकच्या तहसील कार्यालय येथे नाव नोंदणी करावी.