अतिवृष्टीमुळे संत्रा फळगळती; सर्व्हे करून आर्थिक मदत द्यावी:शेतकऱ्यांचे तहसीलदारांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन,

ता.मोर्शी/प्रतिनिधि,दि.24
तिवसा तालुक्यात अतिवृष्टीमुळे आंबिया बहार संत्रा फळांची गळती होत असून, शासन स्तरावर आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत नुकतेच तिवसाच्या तहसीलदारांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.एका महिन्यापासून तालुक्यात वादळी पावसाने परिपक्व झालेल्या संत्रा फळाला फटका बसला आहे. परिपक्व झालेला संत्र्याचे फळे गळायला सुरुवात झाली आहे. या वर्षी आंबिया बहाराचे उत्पादन कमी असताना अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच वातावरण बदलामुळे किडींचे प्रमाण वाढून फळगळ सुरूच आहे. फायटोप्थोरा बुरशीची समस्या वाढत असल्याने संत्रा गळती होत आहे. कुठे फांदीमर तर कुठे डायबॅक सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यासह झाडांच्या रचनेतही बदल झाला आहे. अशा विविध कारणांमुळे आंबिया बहारातील संत्र्याची फळगळ होत आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे ६० टक्के संत्रा फळगळती झाली आहे. मागील वर्षीही संत्रा फळगळतीचे प्रमाण तिवसा तालुक्यात अधिक होते. कुऱ्हा मंडळातील वडुरा, वागदा, चेनुष्टा, रहिमाबाद, कुऱ्हा भाग १, आदी क्षेत्रातील शेतकऱ्यांना फळगळतीचा सामना करावा लागत आहे. शेतीवरील उत्पादन शुल्क, रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके, त्यावर लादलेल्या जीएसटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. संत्रा पिकांवर दरवर्षी खर्च वाढत असल्याने शेतकरी वर्ग कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे. दरवर्षी शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येत असल्याने तिवसा मंडळात शेतकरी आत्महत्या करत आहेत. तिवसा तालुक्यात २८०० हेक्टर जमिनीवर संत्रा लागवड असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष देत संत्र्याच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून आर्थिक वाढीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केले आहे.निवेदन देताना शेतकरी विपुल नेरकर, निखिल तेटू , उमेश दारोकार, जानराव तेटू, कुंजन बंगरे, प्रदीप दमाये, महेश दारोकार, गिरीश दातीर, मनोज फूसे, पुष्पक शर्मा, सदाशिव महेंगे, राजाभाऊ बाभूळकर, अशोक पवार, दिलीपसिंग नाहटे, सतीश डहाके, प्रफुल्ल दारोकार, संजय दारोकार, नितीन नेरकर, राजाभाऊ बिंड, अनंत पाखरे, रहिम खान, बशीरखाँ, शकील शेख, इरशाद शेख, राजिक शेख, इद्रिस खान, खलील शेख हक्का शेख, साबीर उपस्थित होते. तिवसा तालुक्यात अतिवृष्टीमुळे आंबिया बहर संत्रा फळांची गळती होत असल्याने नुकतेच आ. राजेश वानखेडे यांना निवेदन देण्यात आले. पावसामुळे होत असलेल्या संत्रा फळ गळतीची समस्या आमदारांनी जाणून घेतली. अतिवृष्टीमुळे तालुक्यात यंदा आंबिया बहाराचे उत्पादन कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच वातावरण बदलामुळे किडींचे प्रमाण वाढून फळगळ सुरूच आहे. गेल्या वर्षीही संत्रा फळगळतीचे प्रमाण तिवसा तालुक्यात अधिक होते. शासनाने तातडीने लक्ष देत संत्र्याच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदारांकडे केली आहे.



