जालना येथे 5 बालकामगारांची सुटका; एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल
जालना/प्रतिनिधी,दि.23
जिल्ह्यात बालकामगार प्रथेला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेत पाच बालकामगारांची सुटका करण्यात आली. तसेच एका आस्थापना मालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बालकामगार अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
14 वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. कायद्यानुसार, दोषी मालकास किमान 3 महिने कारावास आणि 20 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. जिल्ह्यात कुठेही बालकामगार आढळल्यास नागरिकांनी तत्काळ 1098 या चाईल्डलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बालकामगार शोध मोहिमेसाठी जिल्हा बालकामगार अधिकारी, चाइल्ड हेल्पलाईन, पोलीस प्रशासन, आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींचे एक विशेष संयुक्त पथक गठित करण्यात आले होते. या पथकाने शहरातील विविध दुकाने, हॉटेल्स आणि छोट्या उद्योगांवर अचानक छापे टाकले. या कारवाईत एकूण पाच अल्पवयीन मुले काम करताना आढळली. यात एका 14 वर्षांखालील बालकाचा आणि 16 वर्षांवरील चार किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांना बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले आहे. समितीच्या आदेशानुसार या मुलांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, बाल आणि किशोर कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 चे उल्लंघन केल्याप्रकरणी एका मालकावर कठोर कारवाई करत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. असेही कळविले आहे.


