खरीप हंगाम-2024; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकस्पर्धा
शेतकऱ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

जालना/प्रतिनिधी,दि.11
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीतजास्त शेतकरी पिक स्पर्धामध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून शासन निर्णय क्र. पीकस्पर्धा -2020/प्र.क्र.113/4अे. दि. 20 जुलै 2023 अन्वये खरीप हंगाम 2024 पासून पिकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, मुग व उडीद या पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
पीकस्पर्धेतील पीके -: खरीप पीके- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, मुग व उडीद.
पात्रता निकषः- स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असावी व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत,
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीखः- 4 खरीप हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख पुढील प्रमाणे राहिल. मुग व उडीद 31 जुलै. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल 31 ऑगस्ट. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी.
तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल – प्रथम, व्दितीय व तृत्तीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क :-पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु. 300/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु. 150/- राहील.
बक्षिसाचे स्वरुप :- तालुका पातळीवर प्रथम बक्षिस रु. 5000/- व्दितीय रु. 3000/-, तृत्तीय रु. 2000/-. जिल्हा पातळीवर प्रथम बक्षिस रु. 10000/- व्दितीय रु. 7000/-, तृत्तीय रु. 5000/-. राज्य पातळीवर प्रथम बक्षिस रु. 50000/- व्दितीय रु. 40000/-, तृत्तीय रु. 30000/-.
दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जी. आर. कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.