लोकसभा सार्वत्रिक निवडणुक- 2024 रोख रक्कम जप्तीच्या प्रकरणी जिल्हा तक्रार समिती स्थापन
जालना/प्रतिनिधी,दि.15
आगामी जालना लोकसभा निवडणुक 2024 ची आचारसंहिता लागू आहे. योग्य कागदपत्रांशिवाय 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड बाळगल्या प्रकरणी निवडणूक फिरते पथक, स्थिर पथक (एफएसटी/एसएसटी) ही रक्कम जप्त करेल. त्यानंतर जप्त केलेला निधी तातडीने सोडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार जिल्हा तक्रार समिती स्थापन करण्यात आली आहे.
जिल्हा तक्रार समिती या समितीचे अध्यक्षपद जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे असेल. मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी, निवडणूक खर्च संनियंत्रण समिती राजू सोळंके (संयोजक) मोबाईल क्रमांक (7875200393) व जिल्हा कोषागार अधिकारी जालना हे समितीचे सदस्य असतील जप्त केलेली रोकड सोडण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तींनी संयोजक यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
भरारी पथके, स्थिर पथक यांच्याकडून जप्त केलेल्या रकमेचा कोणत्याही उमेदवाराशी किंवा राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही निवडणूक प्रचार, इत्यादीशी संबंध नाही, असे दिसून आल्यास समिती अशी रोख रक्कम ज्यांच्याकडून जप्त करण्यात आली होती, अशा व्यक्तींना देण्याबाबतचे वस्तुनिष्ठ मौखिक आदेश दिल्यानंतर अशी रक्कम तात्काळ परत करण्याची उपाययोजना करील. समिती सर्व प्रकरणांचा विचार करील व जप्तीबाबत निर्णय घेईल. जप्त केलेली व परत देण्यात येणारी रोख रक्कम 10 लक्षपेक्षा अधिक असल्यास ती रक्कम देण्यात येण्यापुर्वी आयकर विभागाच्या मध्यस्थ अधिकाऱ्याला सूचित करण्यात येईल. कोणताही प्रथम माहिती अहवाल, तक्रार दाखल केली असल्याखेरीज मतदानाच्या दिनांकानंतर 7 दिवसापेक्षा अधिक दिवसासाठी कोषागारांत प्रलंबित ठेवता येणार नाही. अशी सर्व प्रकरणे अपील समितीसमोर ठेवण्याची आणि अपील समितीच्या आदेशानुसार रोख रक्कम/मौल्यवान वस्तू परत करण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिका-याची असेल. तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाने वरील समिती काम करेल, असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी (खर्च पथक प्रमुख) जालना यांनी प्रसिध्दीपत्रकद्वारे कळविले आहे.