जालना शहरातील भाग्यनगर बाजूने जाणारा एकता ढाबा ते मुक्तेश्वरद्वार रस्ता तातडीने दुरुस्त करा -जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

जालना/प्रतिनिधी, दि.25
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. भाग्यनगरच्या बाजूने जाणारा एकता ढाबा ते मुक्तेश्वरद्वार हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. हा रस्ता शहरातील एक प्रमुख रस्ता आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नगर परिषदेच्या असलेल्या प्रचंड दुर्लक्षामुळे जालना शहरातील नागरिकांना अनेक खड्डेमय रस्त्यांचा त्रास सहन करीत प्रचंड मन:स्तापला सामोरे जावे लागत आहे. यापैकीच एक असलेल्या जालना शहरातील भाग्यनगर बाजूच्या एकता ढाबा ते मुक्तेश्वरद्वार या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे.
जुन्या जालन्यातील नागरिकांना सातत्याने होणाऱ्या वाहन कोंडीतून बाहेर पडण्यासाठी चा एकता ढाबा ते मुक्तेश्वरद्वार हा रस्ता मागील दोन वर्षापासून अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची प्रचंड दुरस्ता झाल्याने महात्मा गांधीचे चमन ते शनीमंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या मुख्य रस्त्यावरील वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
नागरिकांच्या सोयीचा हा रस्ता जालना नगर परिषदेच्या निद्रिस्त भूमिकेमुळे अडगडीत पडला आहे सन 2004 मध्ये या रस्त्याची बांधणी करण्यात आली तेव्हापासून या रस्त्याच्या दुरुस्तीवर नगरपरिषदेने एक रुपयाही खर्च केलेला नाही नगर परिषदेने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून या रस्त्यावर सतत दलदल राहत असल्यामुळे हा सिमेंट रस्ता करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली. रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी दिला आहे.