उरण शहरातील कचऱ्याच्या समस्या बाबत मनसे आक्रमक
त्वरित साफसफाई करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30
उरण नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापनाचा ठेकेदार उंटावरून शेळ्या हाकण्याचा काम करतोय.असा आरोप करत मनसेने उरण शहरातील कचरा समस्यावर आवाज उठविला आहे.उरण शहरात गेले चार-पाच दिवस कचरा व्यवस्थापनाचा खेळ खंडोबा झालाय त्याकरीता मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात मनसेने म्हटले आहे की कचरा व्यवस्थापनाचा कारभार लवकर सुरळीत करावा अन्यथा ढोल ताशांच्या गजरात कचरा आपल्या कार्यालयात आणून टाकला जाईल.
त्यावेळी मुख्याधिकारी समीर जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बोलावून सूचना दिल्या. आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना आश्वासित केलं की उद्यापासून कचरा व्यवस्था सुरळीत चालेल आपणास कोणती तक्रार येणार नाही. संबंधित ठेकेदाराने या पुढे काम नीट नाही केलं तर त्याचा ठेका रद्द केला जाईल हे देखील सांगितलं.यावेळी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तालुका अध्यक्ष ॲड. सत्यवान भगत, शहराध्यक्ष धनंजय भोरे, शहर सचिव दिनेश हळदणकर, शहर उपाध्यक्ष उमेश वैवडे, सुभाष पाटील, उपविभाग अध्यक्ष अमर ठाकूर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.