समाज कल्याण विभागाकडून संविधान दिन उत्साहात साजरा

जालना/प्रतिनिधी,दि. 26
भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत बुधवार दि. 26 नोव्हेबर 2025 रोजी संविधान दिन सहायक आयुक्त,समाजकल्याण जालना या कार्यालयात साजरा करण्यात आला आहे. मुख्य कार्यक्रमापुर्वी संविधान सन्मान रॅली व सहायक आयुक्त, समाज कल्याण जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जनजागृती रॅलीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. रॅलीचा प्रारंभ मंठा चौफुली येथून झाला आणि विद्यार्थ्यांनी संविधान मूल्यांच्या घोषणा देत मस्तगड येथे मार्गक्रमण केले. मस्तगड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील दुपारी 12.30 वाजता मुख्य कार्यक्रमास कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी आशिमा मित्तल ,उदघाटक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे, सेवानिवृत्त उपप्राचार्य बी.वाय.कुलकर्णी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. राजकुमार म्हस्के , तसेच अविनाश बहिर आदि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे यांनी केले . तद्नंतर संविधान उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी संविधान उद्देशपत्रिकेतील समान संधी या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संविधानातील मूल्यांना दैनंदिन आयुष्यात जगण्याचे आवाहन केले . तसेच शासकीय वसतिगृह निरीक्षण समितीच्या अध्यक्ष या नात्याने वसतिगृह व शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सोयी- सुविधा देण्यासाठी व त्यांच्या अडचणी समजून त्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमी तत्पर असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या उ्दघाटक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना श्रीमती मिन्नू पी.एम यांनी संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन संविधानातील मुलभूत तत्वावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते से.नि उपप्राचार्य बी.वाय.कुलकर्णी यांनी संविधानातील मूलभूत मूल्यांवर प्रभावी विचार व्यक्त केले. तसेच डॉ. राजकुमार म्हस्के यांनी संविधानाबाबत आपले विचार व्यक्त केले. इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अविनाश बहिर यांनी उपस्थितास मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी जालना यांच्या हस्ते राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांच्या हस्ते शासकीय निवासी शाळा व वसतिगृहातील संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना, सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच शासकीय निवासी शाळा बदनापूर येथील राज्यस्तर व विभागस्तर क्रिडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सत्कार करण्यात आला. मुलींची शासकीय निवासी शाळा जालना येथील विद्यार्थींनी संविधानावर आधारित पथनाट्य कार्यक्रमात सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी यांनी केले. कार्यक्रमात सहायक आयुक्त,समाजकलयाण जालना कार्यालयातील व सर्व शासकीय वसतिगृह , शासकीय निवासी शाळा कार्यालयातील सर्व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. असे कळविले आहे.



