भाजपा नेते सतीश घाटगे यांनी सोडले ग्रामस्थांचे उपोषण
पांगरा ते पारडगाव या रस्त्यासाठी सतीश घाटगे यांनी यंत्रणा पाठवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात
वडीगोद्री/प्रतिनिधी,दि.4
घनसावंगी तालुक्यातील पांगरा ते पारडगाव या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी.तसेच ठेकेदार व दोषी अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करावी.अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी ३० एप्रिल रोजी गणेश मंडपे व ग्रामस्थ रस्त्याच्या कडेलाच साखळी उपोषणाला बसले होते.याची दखल घेत भाजपा नेते सतीश घाटगे यांनी मदतीचे आश्वासन देत काम सुरू करण्यासाठी यंत्रणा पाठवून प्रत्यक्षात काम सुरू करून उपोषण सोडले.
पारडगाव ते पांगरा ग्रामीण रोड क्रमांक २३ हा रस्ता अधिकारी व ठेकेदार यांनी वेळोवेळी कागदपत्रे पूर्ण करून माती रस्ता व त्यानंतर पाणंद मुक्त अशा विविध प्रकारच्या योजनेतून काम न करता बोगस बिले उचलून घेतले आहेत.तसेच अवघ्या २ वर्षापूर्वी या रस्त्याचे खडीकरण काम न करता जुनीच खडी जेसीबी या यंत्राद्वारे उकरून त्याच खडीवर मुरूम वगैरे टाकून काम झाले असे ठेकेदार व अधिकारी यांनी दाखविले आहे.हा रस्ता घनसावंगी तालुका व अनेक गावांना जोडणारा रस्ता असून शेतकरी व विद्यार्थी या रस्त्याने शेतात तसेच शाळेत जातात.पावसाळ्यात या रस्त्याने चालताना तारेवरची कसरतच करावी लागते.
या निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन व तोंडी वारंवार भेटून दिली.परंतु त्यांनी “तुम्ही इंजिनियर आहात का ? बोगस काम कस होईल ? तुम्हाला कामातील काही कळत का ? अशी उलट तपासणी ग्रामस्थांची केली.त्यामुळे ग्रामस्थांनी ३० एप्रिल रोजी रस्त्याच्या कडेलाच साखळी उपोषणास सुरुवात केली.परंतु कोणत्याही पक्षाच्या आमदार,पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेतली नाही.
शेवटी समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांनी या उपोषणाची माहिती मिळताच त्यांनी उपोषणकर्त्यांकडे धाव घेतली.त्यांची समस्या जाणून घेवून तात्काळ रस्त्याच्या कामासाठी यंत्रणा पाठवून जवळपास ३ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू करून या ग्रामस्थांचे उपोषण सोडले.यावेळी अशोक तायडे,बंडू खरात,पुंजाराम झोरे,सोपान भालेकर,विष्णु आढाव,सुखदेव गाढेकर,दत्ता झोरे,राजकुमार उगले,मुंजाराम भालेकर,गणेश चाळक या उपोषणकर्त्यांसह यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रतिक्रिया
१) घनसावंगी विधानसभा मतदासंघातील विकास नेमका कुठे व कसा झाला ? हा मोठा यक्ष प्रश्न आहे.परंतु बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते व अधिकारी यांचा मात्र विकास झालेला दिसून येतो.गेल्या पंचवीस वर्षात काही काळ सोडता कायम सत्ता होती.परंतु कुठेही रस्ते तसेच पायाभूत सुविधां दिसून येत नाही.या बोगस कामाचा हिशोब मतदार विधानसभा निवडणुकीत नक्की घेईल…सतीश घाटगे,भाजप नेते
२) सन २०२१ – २२ या वर्षी झालेल्या पारडगाव ते पांगरा या रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.तसेच या प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घ्यावी.भाजप नेते सतीश घाटगे यांनी आंदोलनाची दखल घेत तात्काळ यंत्रणा पाठवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून हा रस्ता डांबरीकरणासाठी प्रस्ताव पाठविला आहे.असा नेता मतदासंघांला गरजेचा आहे…गणेश मंडपे,ग्रामस्थ,पारडगाव
३) पारडगाव ते पांगरा या रस्त्याचे १२०० मीटर खडीकरण मंजूर होते.ते अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण झाले आहे….एस.ए.कापसे,उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग (जिल्हा परिषद),जालना