जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयात ध्यानसाधनेला सुरुवात

जालना/प्रतिनिधी,दि. 1
जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक स्वास्थासाठी ध्यानधारणा प्रभावी ठरते हे मान्य केलेले आहे. ध्यानसाधना केल्याने मन शांत होते, वैचारिक पातळीमध्ये वाढ होते व शारिरीक आरोग्य सुधारते, तसेच कामकाजातील कार्यक्षमता सुधारते. त्यामुळे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आता नियमित ध्यानसाधना हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या निर्णय घेतला आहे. तरी सोमवार दि.1 सप्टेंबर 2025 रोजी तहसीलदार तथा प्रशिक्षक प्रणाली तायडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनामध्ये सकाळी 10 ते 10.20 या वेळेत ध्यान साधना कार्यक्रम पार पडला.
सद्यस्थितीत दैनंदिन जीवनातील व्यस्तता व तणावपूर्ण जीवनशैली हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झालेला आहे. ज्याचा नकळतपणे आपल्या आरोग्य व मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती हा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे हित साधण्यासाठी जीवनमानात ध्यान साधनेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. तरी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानूसार अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यदायी कर्मचारी-सक्षम प्रशासन-समृध्द जिल्हा या संकल्पनेला मुर्त स्वरुप देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात सोमवार दि.1 सप्टेंबर 2025 पासुन दररोज सकाळी 10 ते 10.20 या वेळेत ध्यान साधनेचे आयोजन करण्यात येत आहे. कार्यालयीन कामकाजाची गती वाढविण्यासाठी ध्यानसाधना हा सर्वात सोपा, वैज्ञानिकदृष्ट्या सिध्द आणि सर्वांना उपयुक्त ठरणारा उपाय आहे. असे यावेळी सांगितले.



