
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23
अर्भक मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उददीष्ट आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडीयाच्या नमुना नोंदणी प्रणालीनुसार (२०१७-१९) देशात ५ वर्षापर्यतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून ४.८ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात.
अतिसाराच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय आहे. अतिसाराच्या प्रतिबंधा करिता स्वच्छ व सुरक्षित पिण्याचा पाण्याचा वापर, स्वस्छता, साबण आणि पाण्याने हात धुणे, निव्वळ स्तनपान आणि इष्टतम पूरक आहारसह पुरेसे पोषण, चांगली वैयक्तिक आणि अन्न स्वस्छता, संसर्ग प्रतिबंधाबददल आरोग्य शिक्षण आणि लसीकरणाचे महत्व यांचा समावेश होतोः याव्यतिरिक्त, ओआरएस आणि झिंक गोळया हे आजार लवकर बरे होण्यात अणि प्रतिबंधात्मक उपायांद्वारे मृत्यू टाळण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावतात.
या अनुषंगाने केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून अतिसार नियंत्रण कार्यक्रमाचे नांव बदलून STOP Diarrhoea Campaign असे करण्यात आले आहे. दिनांक १६/०६/२०२५ ते ३१/०७/२०२५ या कालावधीत सदर अभियान राबविणेबाबत सर्व शासकीय यंत्रणाना कळविण्यात आले आहे. याचे सन २०२४ चे घोषवाक्य हे “अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएस ची घेऊनी साथ” असे आहे.
आपल्या रायगड जिल्हयात तसेच उरण तालुक्यात या माहिमे अंतर्गत ओआरएस आणि झिंकचा वापर, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर, माहिती, शिक्षण अणि संपर्क (IEC) तसेच सामाजिक वर्तन बदल संवाद (SBCC) यावर लक्ष केंद्रित करुन दोन महिन्याच्या कालावधीत सर्व भागीधारांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवावचे आहेत.नागरिकांनी, विविध सामाजिक संस्था संघटनानीं,पर्यावरण प्रेमीनी या मोहिमेत, अभियानात सहभागी होऊन सदर रोगा विरोधात मोठया प्रमाणात जनजागृती करावी असे आवाहन उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी केले आहे.शासकीय स्तरावर या मोहिमे विषयी, अभियाना विषयी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती डॉ राजेंद्र इटकरे यांनी दिली आहे.

