“शासन आपल्या दारी” अंतर्गत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जालन्यात 8 सप्टेंबर रोजी नियोजित कार्यक्रमाबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतला आढावा

जालना/प्रतिनिधी,दि. 28
“शासन आपल्या दारी” या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जालना शहरात दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली. कार्यक्रम स्थळी उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. सर्व विभागप्रमुखांनी काटेकोर नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावा, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.
जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विभागप्रमुख उपस्थित होते.
“शासन आपल्या दारी”अभियानातंर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ, महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यात येतात. सध्या राज्यभर या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. या अभियानाचा भाग म्हणून जालना शहरातील नवीन मोंढा परिसरातील भागात दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्यावतीने नियोजित भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी श्री. पांचाळ म्हणाले की, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सर्व समितीप्रमुखांनी सोपवलेली जबाबदारी दक्षतेने पार पाडवी. कार्यक्रम स्थळी उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत. कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, अग्नीशामक वाहन, रुग्णवाहिका, आरोग्य विभागाची टीम सज्ज ठेवावी. कुठल्याही प्रकारे उपस्थितांची गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.