जिल्हाभरात पोळा सणापासून ते दीपावलीपर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी मोहीम

जालना/प्रतिनिधी,दि. 21
जिल्ह्यात पोळा सणापासून ते दीपावली सणापर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती फार मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गोष्टीला पायबंद घालण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलेल्या निर्देशानूसार धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी अशा दुध वदुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीची माहिती देण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दुध वदुग्धजन्य पदार्थांमध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीमुळे सर्वसामान्य लोकांच्या तसेच लहान मुलांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो. तसेच दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या गुणवत्तापुर्ण दुधास योग्य दर मिळत नाही पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होते व भेसळखोर स्वत:चा फायदा करुन घेतात. दुध व दुग्धजन्य पदार्थांतील बाजार पेठेत होणारी भेसळ रोखण्यास जिल्हास्तरीय समिती मार्फत धडक मोहिम राबविण्यात येणार असून बाजार पेठेत होणाऱ्या भेसळीबाबतची माहिती अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे देण्यात यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल. जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार दुध व दुग्धजन्य पदार्थ मिळण्याच्या दृष्टीने मोहीम राबविण्यात येत आहे.

