pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रासायनिक खते, बियाणांची वाढीव दराने विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा-खासदार डॉ. काळे

0 3 2 0 2 8
जालना/प्रतिनिधी, दि.15
जालना- रासायनिक खते, बियाणे व किटकनाशकांची जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ.कल्याण काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपन्याविरोधातही कारवाई करण्याची मागणी डॉ. काळे यांनी केली आहे.
शुक्रवारी दुपारी खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची  भेट घेऊन त्यांना वाढीव दराने बियाणे विक्री व पीकविमा बाबत सविस्तर निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात  जालना जिल्हा काॅंग्रेसचे  अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,जालना शहर जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष  शेख महेमूद, राजेंद्र राख, रविंद्र काळे, ॲड. संजय काळबांडे, विनोद यादव आदींचा समावेश होता.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांना दिलेल्या निवेदनात खासदार. डॉ. काळे यांनी म्हटले आहे की,  खरीप हंगामाला सुरूवात झाली असून, शेतकरी खते, बियाणे, औषधी खरेदी करत आहेत. परंतु शेतकऱ्यांना हवे ते बियाणे, खते, औषधी दुकानदारांकडून पुरवठा होतांना दिसत नाही. शेतकऱ्यांनी हवे ते बियाणे मागितल्यास वाढीव दराने पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अगोदरच मागील वर्षातील दुष्काळाने शेतकरी हवालदिल झालेला असतांना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी ही लूट निंदनीय आहे.
शेतकऱ्यांना मागील वर्षातील दुष्काळामुळे बँकेचे पीककर्ज परतफेड करता आले नाही, त्यामुळे चालू वर्षात बँकेने पीककर्ज देण्यास टाळाटाळ केलेली आहे. शेतकरी उसनवारी व खाजगी सावकरांकडून पैसे घेऊन खते, बियाणे, औषधी खरेदी करत आहेत आणि ते वाढीव दराने खरेदी करावे लागत असल्याने शेतकरी अतिशय संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची अशा पध्दतीने होणारी लूट तात्काळ थांबविण्यासाठी सर्वत्र यंत्रणा नेमण्यात येऊन कडक कारवाईचे आदेश देण्यात यावेत, तसेच यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून हयगय केली जात असल्यास त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यांत यावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्याकरिता ज्या विमा कंपनीला काम देण्यात आलेले आहे. त्या कंपनीने आतापर्यंत शेतकऱ्यांना कोणताही विमा दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या विम्यासाठी शासन मोठ्याप्रमाणात खर्च करत आहे. परंतु त्याचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होतांना दिसून येत नाही. शेतकरी बांधव विमा रक्कमेपासून वंचित राहत आहेत.  संबंधित विमा कंपनीस तात्काळ विमा देण्यासंदर्भात आदेश देऊन, या तक्रारीच्या अनुषंगाने कंपनीविषयी अहवाल शासनाकडे पाठवून देण्यात यावा, अशी मागणीही खासदार डॉ. काळे यांनी केली आहे.
दरम्यान, खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या उपरोक्त तक्रारींची गंभीरपणे दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांंनी शिष्टमंडळास दिले.

image.png
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 0 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे