जालना शहरातील प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना/प्रतिनिधी,दि.3
जालना शहरात वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होत असून अनेकांना विविध आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहे. या प्रदुषणाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे जालना शहरातील प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जालना शहरातील प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व जालना जिल्हा स्टील असोसिएशनचे प्रतिनिधी यांच्या आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी मनिष होळकर, उप प्रादेशिक अधिकारी दिपक बनसोड, क्षेत्र अधिकारी रवि जाधव, जालना जिल्हा स्टील असोसिएशनचे सर्व प्रतिनिधी व नवोपक्रम आणि उद्योजकता संस्था (SINE), आयआयटी मुंबईतील तंत्रज्ञान प्रवर्धन केंद्राचे इंद्रकांत झा यांची उपस्थिती होती.
श्रीमती मित्तल म्हणाल्या की, जालना शहरातील प्रदूषणाची समस्या अधीक असून, शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी तसेच पर्यावरणांचा समतोल राखण्यासाठी शहरातील सर्व नागरिक, स्थानिक उद्योग आणि प्रशासनाने एकत्र येऊन पुढाकार घेतल्यास यावर नक्कीच नियंत्रण आणता येईल. याकरीता सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जालना शहरातील स्टील असोसिएशनच्या वतीने प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच यावेळी नवोपक्रम आणि उद्योजकता संस्था (SINE), आयआयटी मुंबईतील तंत्रज्ञान प्रवर्धन केंद्राचे इंद्रकांत झा यांनी सद्यस्थितीत औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदुषण कमी करण्यासाठी संशोधनात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात असे सूचविले..

