pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे – राज्यपाल रमेश बैस

0 1 7 4 0 8

मुंबई,दि.6

जगभरातील लोक भारतीय संविधानाचे  निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते.

यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर,सदा सरवणकर,कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे, देशभरातून आलेले अनुयायी उपस्थित होते.

     राज्यपाल रमेश बैस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान शिक्षणतज्ज्ञ होते, शोषितवर्गाला शिक्षण मिळाले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. वंचित व बहुजनांना शिक्षण मिळावे  यासाठी ते सतत कार्य करत राहिले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्थांच्या माध्यमातून आजही ते काम सुरू आहे. त्यांनी महिलांच्या अधिकारासाठी कार्य केले आणि महिलांना सन्मान मिळवून दिला. इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे राहत असून याचे कामही लवकरच पूर्ण होईल याचा मला विश्वास आहे, असेही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितले.

भारतीय राज्यघटना संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानानुसार भारतीय लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. भारतीय राज्यघटना संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदे, अर्थव्यवस्था, ऊर्जा, सिंचन, महिला धोरण, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील धोरणांची आखणी केली आणि या धोरणांना मानवतेच्या विचारांची जोड दिली. त्यामुळेच देशाची एकता, बंधुता व एकात्मता या तत्त्वांना बळ मिळाले. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाचे महत्त्व आजच्या पिढीला लक्षात येण्यासाठी शासनाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. सर्वोच्च न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. तसेच इंदू मिल येथे जगाला हेवा वाटेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचबरोबर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कामालाही वेग दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारत देश अतिशय वेगाने प्रगती करीत आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला जाते. भारतीय संविधानाने  सकल बहुजनांना न्याय देण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्री असताना केलेले काम भारताच्या निर्मितीतील महत्वाचे पाऊल ठरते. इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल. दीक्षाभूमी येथे 200 कोटींची विकासकामे सुरू केली आहेत. तसेच लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर शासनाने विकत घेतले आहे. तेथील संग्रहालयाला देश – विदेशातील पर्यटक भेट देतात. जपानमधील कोयासन विद्यापीठामधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

– उपमुख्यमंत्री अजित पवार

देशाची  आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे, या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात समता व बंधुता रुजवण्यासाठी यशस्वी लढा दिला. सर्वोत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती केली. शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, शेतीतज्ज्ञ, संरक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचे कार्य अलौकिक आहे. ते  दूरदृष्टीचे प्रशासक होते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  सादर केलेल्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ प्रबंधाला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत.ही अभिमानाची गोष्ट आहे.

शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे कार्य मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी जे करावे लागेलं त्यासाठी शासन कटीबद्ध आहे. बौद्ध पंचायत समितीची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. या समितीच्या कार्यालयासाठी 25 कोटींचा निधी देण्यात आला असून लवकरच या इमारतीचे काम पूर्ण होईल.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यासाठी शासकीय सुटी जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. सिद्धार्थ कॉलेजच्या विकासासाठी देण्यात आलेला निधी तसेच दि. 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम आयोजन करण्याच्या निर्णयाबद्दल आभार मानले.

यावेळी माजी खासदार नरेंद्र जाधव, भीमराव आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केले तर आयुक्त डॉ. श्री.चहल यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे