सोनार हितकारिणी सभेच्या “चिंतन बैठकीत” सर्वशाखीय सोनार ऐक्याचा निर्धार.

पुणे/शब्दांकन व वार्तासंकलन.- बबन पोतदार. आत्माराम ढेकळे,दि.1
पुणेः- सोनार हितकारिणी सभा समुहाच्या माध्यमातून सर्वशाखीय सोनार समाजाच्या चिंतन बैठकीचे आयोजन पुणे येथील ‘मराठा चेंबर्स आॕफ काॕमर्स ‘च्या लकाकी सभागृहात नुकतेच करण्यात आले होते. यावेळी सुवर्णकार समाजातील सर्वशाखेतील अनेक नामवंत विचारवंतानी मनोगत व्यक्त करुन ‘सोनार ऐक्याचा’ एकमुखी निर्धार व्यक्त केला.
“शाखाभेद न ठेवता सर्व सोनार बांधवानी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.” असा सुर याप्रसंगी व्यक्त झाला. “सर्वांनी मिळुन सोनार ऐक्याची शपथ घेऊन पुढील चळवळ कायम ठेवण्यासाठी समाजातील सर्व स्तरातुन संघटना मजबुत करुन यापुढील चळवळ कायम ठेवण्यासाठी नियोजनबध्द काम करावे.” असे प्रगल्भ विचार प्रा. अभिजित पंडीत यांनी आपल्या ओजस्वी भाषणात व्यक्त केले.
गेल्या तीन वर्षापासुन सोशल मिडियाच्या व्हाॕट्सप
ग्रुपवरुन ‘सोनार हितकारिणी सभेची’ स्थापना झाली आहे. याच माध्यमातून एक आगळे वेगळे व्यासपीठ निर्माण झाला आहे. समाजातील सर्व सोनारांच्या पोटजातींना आळा घालुन सर्वांनी एकत्र यावे आणि या समाजाच्या उन्नतीसाठी एकत्रितपणे काम करावे, हा विचार पुढे येऊन खडके फाउंडेशनच्या सौजन्याने “चिंतन बैठक” आयोजित करण्यात आली होती.
प्रस्तुत बैठकीसाठी महाराष्ट्रातील विविध भागातुन समाजबांधव उपस्थित होते. प्रारंभी आदरणीय संजीव खडके यांनी सर्वांचे स्वागत केले. ‘संपुर्ण सोनार समाज एकत्रित येण्यासाठी समाजातील सर्वांकडून तळमळीच्या सहभागाची आवश्यकता आहे.’असे मत माजी आमदार जयप्रकाश बावीस्कर यांनी व्यक्त केले. शासन दरबारी सोनारांच्या प्रलंबित असलेल्या समस्या व विकासकार्य यांचा पाठपुरावा सातत्याने करीत असल्याचे मोहनसेठ हिवरकर यांनी यावेळी सांगितले. विविध विभागातील प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवानी समाज एकत्रित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे मत अकोला येथील विलासराव अनासने यांनी मांडले. सरकार दरबारी विविध कामासाठी येणाऱ्या अडचणीच्या निवारणासाठी समाजातील उच्चपदस्थ व्यक्ती आणि त्याचबरोबर युवापिढीचीही नितांत गरज आहे, असे प्रा.अभिजित पंडीत म्हणाले. सोनार समाजातील कारागीरांच्या समस्या निवारणासाठी अशा चिंतन बैठकीची अत्यंत आवश्यकता आहे, असे मत संजीव खडके यांनी मांडले. ‘सराफा व्यावसायिक बांधवाच्या समस्यांच्या निवारणासाठी उच्चपदस्थ अधिकारी वर्गाकडून आवश्यक ती मदत केली जाते. असे मी स्वतः अनुभविले आहे. यापुढेही अशा प्रकारचा दिलासा मिळण्यासाठी चिंतन बैठकी सारख्या व्यासपीठाचा उपयोग होऊ शकेल’ असे नांदुरा येथील प्रसिध्द सराफा व्यावसायिक अनंतराव उंबरकर यांनी व्यक्त केले. “समाजातील लहान मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचनींना सामोरे जावे लागते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना व कायदेशीर बाबी व्यवस्थितपणे समजुन घेण्यासाठी ठिकठिकाणी वेळोवेळी प्रबोधन शिबीरे घेणे आवश्यक आहे,”
असे विचार निवृत्त आयकर अधिकारी व ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांनी आपल्या भाषणातुन प्रतिपादन केले.
“समाजातील सर्व पोटजातींना व शाखांना कायमचा राम राम ठोकुन ‘मी सोनार’ म्हणवुन घ्या. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता व शाखेचा उल्लेख न करता, ‘आम्ही सोनार” या छताखाली एकत्र या व समाजाचा उत्कर्ष साधा.” असा मोलाचा सल्ला सनदी अधिकारी शिवानंद टांकसाळे यांनी आपल्या भाषणातुन दिला. या चिंतन बैठकीच्या माध्यमातून प्रामुख्याने सर्वांच्या एकीमुळे सोनार ऐक्याच्या रोपट्यास पालवी फुटून त्याचे भावी काळात नक्कीच वटवृक्षात रुपांतर होईल, असे मत सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भांदरगे व डाॕ .शिवाजी विसपुते यांनी व्यक्त केले.
या चिंतन बैठकीस सोनार समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर व राज्यातील सोनार बांधव, भगिनी तसेच युवावर्गांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यामध्ये प्रामुख्याने रमेश भावेकर,चंद्रकांत पाटणकर, अॕड.राजन दिक्षीत, विजय काजळे, सुरेश वेदपाठक, पारस देवपुरकर, अशोक हिरुळकर, नंदुभाऊ गुंबळे, आशिष पंडीत, मोहन घोडनदीकर, अजय मानोरे, प्रकाश दिक्षीत, प्रभाकर गळंगे, प्रा.ईश्वर सोनार, नितीन डहाळे, जगदीश महामुनी, रमेश पंडीत, मनोज खडके, अॕड.सिध्देश्वर लोळगे, संतोष खोल्लम, सुर्यकांत खोल्लम, नामदेव सुवर्णकार, धनंजय डहाळे, अरविंद हाडे तसेच महिला वर्गातील सामाजिक कार्यकर्त्या मायाताई हाडे, अर्चना सोनार, संगीता पिंगळे, रुपाली दिक्षीत, वंदना पंडीत, यशोदा पर्वतकर, योगिता बैतुले, पत्रकार आत्माराम ढेकळे, अनिल पाटणकर तसेच समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी या बैठकीत आपला परिचय देऊन मनोगतातुन विचार मंथन केले.