नोकरीत सामावून घेत नसल्याने सी डब्यू सी पागोटे कंपनीचे कामगार करणार आमरण उपोषण
उरण/विठ्ठल ममताबादे,दि 21
उरण तालुक्यातील पागोटे येथे सेंट्रल वेअर हाउसिंग कार्पोरेशन (CWC) ही कंपनी कार्यरत आहे. पूर्वी स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य दिले जायचे. जसे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार बदलत गेले तसे कामगांरावर प्रकल्पग्रस्तांवर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय सुरू झाले. ३० वर्षापासून काम करीत असलेल्या प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक कामगारांना डावलून ज्यांच्या या प्रकल्पाशी संबंध नाही आणि या वेयर हाउसमध्ये ज्यांनी या यापूर्वी कधी काम केलेले नाही अशा परप्रांतीय कामगारांना घेउन नोकरभरती करून सी. डब्लू.सी कंपनीतील गोडावून मध्ये प्रत्यक्ष लोडिंग अनलोडिंगचे काम सुरू केले आहे. त्यामुळे स्थानिक भूमीपुत्र असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. केवळ स्वार्थापोटी सीडब्लूसी कंपनी प्रशासन व ठेकेदार हया गोष्टी करीत आहेत.त्यामुळे सुरवातीपासून काम करीत असलेल्या २५० स्थानिक कामगांरांना कामावर त्वरीत रुजू करून घ्यावे अन्यथा सीडब्लूसी वेअर हाउसच्या गेटवर दि २० नोव्हेंबर २०२३ पासून साखळी उपोषण व निदर्शने करण्यात येणार आहे. जर का या कालावधीत प्रश्न सुटला नाही तर दि २७ नोव्हेंबर २०२३ पासून कामगारांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. आणि त्यानेही प्रश्न सुटला नाही तर दि २९ नोव्हेंबर २०२३ पासून कुटूबांसह कामगार प्रश्न सुटेपर्यंत आमरण उपोषण करणार आहेत.
आजपर्यंत कंपनीत अनेक विविध ठेकेदार आले गेले परंतु सदरहू सी.डब्ल्यु.सी. वेअरहाऊसमध्ये स्थानिक कामगार काम करत होते.याबाबत सी.डब्ल्यु.सी. प्रशासनाला पुर्णतः माहित आहे.सी.डब्ल्यु.सी. वेअरहाऊसमध्ये बजट टर्मिनल सी.एफ.एस. प्रा. लि. या कंत्राटदार कंपनीने वेअरहाऊसमध्ये लोडींग अनलोडींगचे काम दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू केले आहे. सदर काम सुरू करतेवेळी पागोटे व पाणजे गावातील प्रकल्पग्रस्त असलेले सर्व कामगार कामावरती रूजु करून घेण्यात आले आहेत. ही सकारात्मक बाब आहे, याचे स्थानिक कामगारांना समाधान आहे. परंतु या व्यतिरीक्त १०० पेक्षा अधिक जे कामगार परप्रांतिय भरण्यात आले आहेत, जे कामगार यापुर्वी या वेअरहाऊसमध्ये कधीही काम केलेले नाही अश्या परप्रांतिय कामगारांची भरती केल्यामुळे गेले ३० वर्षे काम करणा-या आणि आज जे वेअरहाऊस सुरू झाल्यानंतर आपल्याला काम मिळेल, आपल्या कुटूंबाचे ज्यामुळे आपल्याला पालनपोषण करता येईल अश्या अपेक्षेने प्रतिक्षेत असलेले व ज्यांचा या वेअरहाऊसच्या कामामध्ये काम करण्याचा नैसर्गिकरित्या हक्क आहे अश्या कामगारांवर केवळ स्वार्थापोटी नोकर भरती, रोजगारात डावलून अधिक आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने बजट कंपनीच्या संचालकांनी परप्रांतिय कामगारांना कामावर घेऊन पूर्वी काम करणाऱ्या व सध्या बेरोजगार असलेल्या स्थानिक कामगारांवर आणि त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आणली आहे.यामुळे सीडब्लूसी प्रशासन व ठेकेदार यांच्या विरोधात सर्व कामगारांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे.
वस्तुत: सदर बजट कंपनीने १९ फेब्रुवारी २०२३ रोजी ज्यावेळी काम सुरू केले त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीमध्ये कामाच्या स्वरूपात जस-जसी वाढ होत जाईल त्याप्रमाणामध्ये उर्वरीत कामगार कर्मचा-यांना कामावर घेतले जाईल.असे आश्वासन कामगारांना दिले होते.उदा. ५०० ट्यूज झाल्यांनतर अधिक ५० कामगार घेतले जाईल असे आश्वासन दिले होते.५००-५०० ट्यूजचे काम जसे जसे वाढत जाईल तसे तसे ५०-५० कामगारांना कामावर घेण्यात येईल असे सर्वानुमते ठरले होते. परंतु आज प्रत्यक्ष माहिती घेतली असता कंपनीचे काम ४५०० ट्यूज पेक्षा अधिक झाले असल्याची माहिती मिळत आहे. या संपुर्ण परिस्थितीचा विचार करता ठरल्याप्रमाणे प्रत्येक ५०० ट्यूज प्रमाणे ५० कामगार घेण्यात आले असते तर आज ज्यांना काम नाही अशा बेरोजगार स्थानिक सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आली नसती. कामावर परप्रांतीय कामगारांना घेण्याऐवजी स्थानिक कामगारांना कामावरती रूजु केले असता हे कामगार अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तम वातावरणात काम करून कंपनीला फायदा करून दिला असता. पण तसे झाले नाही. स्थानिक, जुन्या कामगारांना नोकरीत डावलण्यात आले.मागण्या पूर्ण होत नसल्याने कामगारांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे, विभागीय कामगार आयुक्त, पोलीस आयुक्त नवी मुंबई, तहसीलदार उरण, सहाय्यक पोलीस आयुक्त न्हावा शेवा पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून स्थानिक कामगारांना नोकरीत सामावून घेण्याची विनंती केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा कामगारांनी प्रशासनाला दिला आहे.
——————————————————-
आम्हा कामगारांवर होणारा अन्याय हा केवळ बजट कंपनीला आर्थिक नफा अधिक व्हावा या उद्देशाने सीडब्लूसी कंपनी प्रशासन कामगांराच्या मागण्यांकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत आहे. नोकरभरती जाणून बुजून केली जात नाही, ठेकेदार व सी. डब्लू सी कंपनी प्रशासनातर्फे कामगांरावर अन्याय होत आहे तरी या प्रकरणी संबंधित केंद्र व राज्य सरकारच्या सर्व अधिकारी पदाधिकारी तसेच या तालुक्यातील पदाधिकारी, सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन आम्हा कर्मचाऱ्यांना न्याय दयावा ही विनंती.कामगारांच्या मागणीसाठी शासनाच्या सर्व विभागात तसेच सर्वच राजकीय नेत्यांना प्रत्यक्ष भेटून पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला आहे.
– राजेंद्र मोहिते.यूनियन अध्यक्ष.
कामगारांच्या मागण्याशी आमचा कोणताही संबंध नाही. कामगारांचा प्रश्न कंपनीच्या प्रशासनाशी निगडित आहे. वाशी येथे मुख्य कार्यालय आहे. त्यांनी कंपनी प्रशासन वाशी व दिल्ली येथे मागण्या व पत्रव्यवहार करावा. सदर कामगारांचा प्रश्न कधीही न सुटणारा आहे. हा प्रश्न कधीच सुटू शकत नाही.
– निखिल भंडारी,ठेकेदार, सीडब्लूसी, पागोटे