पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षा निमित्त अंबड ते चौंडी बस सेवेचा शुभारंभ

अनिल भालेकर/अंबड,दि.26
अंबड बस आगाराच्यावतीने अंबड ते चौंडी थेट प्रवासी बस सेवेचा शुभारंभ 25 मे रोजी भव्य कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी करण्यात आला.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ पावन भूमी चौंडी जिल्हा अहिल्यानगर असून संपूर्ण महाराष्ट्र बरोबरच भारतातून असंख्य राष्ट्रमाता भक्त चौंडी या गावी नतमस्तक होण्यासाठी येतात. 31 मे या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात या पवित्र भूमीस नतमस्तक होण्यासाठी माता भगिनी, आबालविरुद्ध, तरुण-तरुणी, लहान बालके भक्तजन आपल्या संपूर्ण परिवारासहीत आवर्जून जात आहेत.अंबड शहर व संपूर्ण अंबड तालुक्याबरोबरच शेजारील घनसावंगी, बदनापूर,परतूर, जालना, जाफराबाद,भोकरदन तालुक्यात धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात आहे. परंतु अंबड आगारातून व जालना जिल्ह्यातील इतर कुठल्याही आगारातून थेट बस चौंडी येथे जात नसल्यामुळे या पावन नगरीत नतमस्तक होण्यास जाणाऱ्या भक्तांची अत्यंत गैरसोय होऊन आर्थिक फटकाही सहन करावा लागतो तसेच वेळेचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.
त्यामुळे अंबड ते चोंडी अशी प्रवासी बस अंबड आगारातून सुरू करण्यात यावी अशी मागणी सकल धनगर समाज अंबडच्या वतीने करण्यात आली होती.ज्यामुळे 6 तालुक्यातील प्रवाशांबरोबरच या मार्गावर असणाऱ्या वडीगोद्री, शहागड,गेवराई,बीड,पाटोदा, जामखेड भागातील प्रवाशांना या बसची सेवा उपलब्ध होईल.
संपूर्ण परिवारासहित अंबड ते चोंडी बसने पावन भूमी चौंडी येथे जाऊन नतमस्तक होऊन परत त्याच बसने प्रवाशांना वापस येणे या बस सेवे मुळे शक्य होईल.
शुभारंभ प्रसंगी आकर्षक सजवलेल्या बसचे मान्यवरांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आगार प्रमुख,वाहक, चालक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अत्यंत आकर्षक सजवलेल्या लक्षवेधी ठरलेल्या बस सोबत प्रवाशांनी फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. अंबड आगाराच्या या बस सेवेमुळे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.