निवडणूकीच्या कामात हलगर्जीपणा; दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाई
जालना/प्रतिनिधी,दि.6
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध पथके कार्यरत आहेत. दरम्यान, स्थिर पथक, मालखेडा (सिल्लोड-भोकरदन रस्ता) येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी (दि. 4 मे) प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली असता तपासणीमध्ये विविध त्रुटी आढळुन आल्या. निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची कार्यवाई करण्यात आली.
तपासणीच्या वेळी निवडणूक कर्तव्यावर नेमलेले एक ग्रामसेवक नियुक्तीच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे दिसून आले. तर एक ग्रामसेवक मद्य प्राशन करुन सेवेत कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. तसेच दुपारी 2 ते 4 वेळेदरम्यान नोंद रजिस्टरनुसार कोणत्याही वाहनाची तपासणी केली नसल्याचे दिसून आले.
निवडणूक काळात सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षतेने व प्रामाणिकपणे पार पाडावी. कामात कुठल्याही प्रकारे बेजबाबदारपणा केल्याचे आढळून आल्यास तात्काळ कार्यवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.