दरमहा रस्ते अपघातांचे विश्लेषण करून तातडीच्या उपाययोजना करा – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना/प्रतिनिधी,दि.4
जिल्ह्यात दरमहा होणाऱ्या रस्ते अपघातांचे सखोल विश्लेषण करून ते तातडीने कमी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल, कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग सा. बां. वि.क्रमांक 1 ) स्मिता पवार, पोलीस उपअधीक्षक रविंद्र निकाळजे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील तसेच जालना शहरातील अपघातप्रवण स्थळांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. या ठिकाणी आवश्यक सूचक व चेतावणी फलक त्वरित बसविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. सन 2025 मध्ये जिल्ह्यात एकूण 756 रस्ते अपघात घडले असून, त्यापैकी 318 अपघात जीवघेणे ठरले आहेत. या अपघातांमध्ये 355 नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहनांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले असून, दुचाकीस्वारांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा सक्तीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. याशिवाय, जालना शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या अपघातप्रवण ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित आयटीएमएस – इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री प्रणाली बसविण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे विना हेल्मेट वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, वेगमर्यादा ओलांडणे तसेच सिग्नल तोडणे यांसारख्या वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर स्वयंचलित ई-चलान प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हा प्रकल्प जालना जिल्ह्यात लवकरच राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते सुरक्षिततेसाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि अपघातमुक्त जिल्हा घडविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी केले.

